कचराकोंडी अंशत: सुटली!
By Admin | Updated: May 31, 2016 03:09 IST2016-05-31T03:09:48+5:302016-05-31T03:09:48+5:30
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत बायोगॅस प्लांट उभारणीच्या कामाला ग्रामस्थांचा विरोध मावळल्याने उंबर्र्डे परिसरात या कामाला प्रारंभ झाला आहे

कचराकोंडी अंशत: सुटली!
कल्याण : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत बायोगॅस प्लांट उभारणीच्या कामाला ग्रामस्थांचा विरोध मावळल्याने उंबर्र्डे परिसरात या कामाला प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर बारावे, उंबर्डे आणि मांडा या ठिकाणच्या प्रस्तावित शास्त्रोक्त भरावभूमी प्रकल्पाला पर्यावरण विभागाची प्राथमिक मंजुरी मिळाल्याने घनकचरा व्यवस्थापनाला गती येण्याची चिन्हे आहेत.
घनकचरा व्यवस्थापन नीट न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेची कानउघाडणी केली होती आणि नव्या बांधकामांवर बंदी घालून दणका दिला होता. त्यामुळे केडीएमसी खडबडून जागी झाली. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करणे त्याचबरोबर बारावे, उंबर्डे आणि मांडा याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने भरावभूमी प्रकल्प राबवणे आणि १३ ठिकाणी बायोगॅस प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भरावभूमी प्रकल्प राबवण्यास उंबर्डेवासीयांनी नकार दिला आणि बायोगॅस प्लांटलादेखील विरोध दर्शवला होता. १३ ठिकाणी हे प्लांट उभारले जाणार असल्यामुळे एकाच वेळी सर्वत्र प्लांट सुरू झाले पाहिजेत. केवळ उंबर्डेला बायोगॅस प्लांट उभारू नका. कारण, भविष्यात जर प्लांट बंद पडला आणि कचरा आणून गावात टाकला गेला, तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही सर्वपक्षीय उंबर्डे डम्पिंगविरोधी कृती समितीने उपस्थित केला होता.
समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच आयुक्त ई. रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेऊन विरोध दर्शवला होता.
यावेळी झालेल्या चर्चेत बायोगॅस प्लांट बंद होणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला आयुक्तांकडून देण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात स्थानिकांचा विरोध मावळल्याने उंबर्डे येथे बायोगॅस प्लांटच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०१६ पर्यंत मार्गी लागेल, असा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.