वर्सोवा-विरार सागरी मार्गाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विशेष मागणी
By धीरज परब | Updated: May 29, 2025 08:32 IST2025-05-29T08:32:27+5:302025-05-29T08:32:53+5:30
उत्तन पासून वसई विरारच्या मच्छीमारांना दिलासा मिळण्यासह कोट्यवधी रुपयांची होणार बचत

वर्सोवा-विरार सागरी मार्गाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विशेष मागणी
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मुंबईच्या वर्सोवा वरून उत्तन व पुढे वसई-विरारला जाणारा सागरी मार्ग अर्थात कोस्टल रोड हा व्हाया उत्तन न नेता दहिसर-भाईंदर ६० मीटर लिंक रस्ता मार्गे वसई - विरारला नेल्यास उत्तन पासून वसई - विरार किनारपट्टी वरील हजारो मच्छीमारांना दिलासा मिळेल. शिवाय कोस्टल मार्गाच्या खर्चात कोट्यवधी रुपयांची बचत होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.
मुंबई ते वर्सोवा हा सागरी मार्ग वर्सोवा वरून पुढे भाईंदरचे उत्तन व पुढे वसई - विरार, पालघर, वाढवण बंदर असा जाणार आहे. मात्र त्याच वेळी दहिसर पश्चिम - भाईंदर ६० मीटर रुंदीचा लिंक रस्ता हा पुढे वसई - विरार ला जोडला जाणार आहे. वर्सोवा ते विरार हा कोस्टल मार्ग उत्तन वरून वसई - विरार ला आणि पुढे पालघर असा नेण्यात किनारपट्टी वरील हजारो मच्छीमारांना त्याचा फटका बसणार आहे. आधीच मासेमारी संकटात असताना कोस्टल रोड त्यात भर टाकणारा ठरण्याची भीती मच्छीमारांनी जाहीरपणे व्यक्त करत कोस्टल मार्गास विरोध केला आहे.
गोराई पासून पालघर पर्यंतचा समुद्र किनारा हा पर्यटन क्षेत्र देखील असून त्यावर हजारो स्थानिक भूमिपुत्रांचे व्यवसाय - उपजीविका अवलंबून आहे. कोस्टल मार्गा मुळे किनारपट्टी आणि समुद्राचे निसर्ग सौंदर्य बाधित होणार असल्याने येथील पर्यटन व्यवसायास फटका बसणार आहे. उत्तन भागातील मच्छीमार संस्था, कोळी जमात, स्थानिक माजी नगरसेवक आदींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटून उत्तन समुद्रातून प्रस्तावित कोस्टल मार्गास विरोध दर्शवत भूमिपुत्र मच्छीमारांचे होणारे नुकसान आणि परिणाम बाबत माहिती दिली. व पर्याय काढण्याची विनंती केली होती. वसई - विरार व पुढे पालघर दरम्यानच्या सागरी किनारपट्टीवरील अनेक कोळीवाडे आणि हजारो मच्छीमारांचा तसेच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा विचार करण्याची मागणी पुढे आली.
मुंबई महानगर क्षेत्रातील भविष्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी व मीरा-भाईंदर, वसई-विरार शहरातील नागरिकांना पश्चिम पट्ट्यात मोठ्या रस्त्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच वाढवण बंदराच्या निर्मितीनंतर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतुकीचा विचार करून हा राज्य शासनाने कोस्टल मार्गाचा चांगला निर्णय घेतलेला आहे असे मंत्री सरनाईक म्हणाले.
किनारपट्टी परिसर पुर्णतः मच्छीमार कोळी बांधवांचा असल्याने सर्वसामान्य कोळी बांधवांचा उदरनिर्वाह हा मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. आगरी-कोळी बांधव हे महाराष्ट्राचे भुषण असून त्यांच्या संस्कृतीला व परंपरेला नेहमीच आपल्या सरकारने प्रोत्साहन दिले आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या सरकारचे आभार मानले आहेत. परंतू, वर्सोवा ते उत्तन, उत्तन ते वसई हा कोस्टल मार्ग जर उत्तन गावाजवळील समुद्रातून गेला तर यामुळे कोळी बांधवांच्या मत्स्य व्यवसायावर फार मोठे संकट येणार आहे. त्यामुळे सदरचा कोस्टल रोड हा उत्तन गावाजवळील समुद्रातून न करता वर्सोवा ते दहिसर मार्गे आणावा. त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दहिसर ते सुभाषचंद्र बोस मीरा-भाईंदर हा ६० मीटरचा रस्ता गेल्या सरकारच्या कार्यकाळात मंजूर करून घेतला असून जागेवर त्याचे कामही चालू आहे. या ६० मीटर रस्त्याला वर्सोवा ते दहिसर हा कोस्टल रोड जोडल्यास सुभाषचंद्र बोस मैदानावरून भाईंदर मार्गे वसई-विरारला नेल्यास राज्य शासनाच्या खर्चातही बचत होईल. तसेच काळी बांधवांच्या मत्स्य व्यवसायावर जे संकट येणार आहे ते ही दूर होईल असे मंत्री सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.
उत्तन मार्गे जाणारा हा कोस्टल रोड रद्द करून तो वर्सोवा ते दहिसर मार्गे स्थलांतरीत करून कोळी बांधवांची समस्या दूर करावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रा द्वारे केली आहे.