खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, साचलेल्या पाण्यानेही ठाणेकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:38 AM2019-08-03T00:38:01+5:302019-08-03T00:38:28+5:30

घोडबंदरसह खारेगाव टोलनाक्यावर ट्रक बंद : साचलेल्या पाण्यानेही ठाणेकरांचे हाल

Traffic congestion due to pits | खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, साचलेल्या पाण्यानेही ठाणेकरांचे हाल

खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, साचलेल्या पाण्यानेही ठाणेकरांचे हाल

Next

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर आणि भिवंडी-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी घोडबंदर भागातील आनंदनगर येथे वळणावर ट्रक बंद पडल्याने ठाण्याच्या दिशेने आणि पुढे घोडबंदरकडे जाणारी अशी दोन्ही बाजूंची वाहतूक तब्बल दीड ते दोन तास ठप्प झाली होती. ही कोंडी सुटत नाही, तोच खारेगाव टोलनाक्याजवळ एका तासात दोन ट्रक बंद झाल्याने नाशिकच्या दिशेने जाताना माजिवड्यापर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले असून ठिकठिकाणी आणि उड्डाणपुलांवरसुद्धा खड्डे पडले असल्याने वाहतूककोंडीत भर पडली. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले.

शुक्रवारची सकाळ घोडबंदरकरांना वाहतूककोंडीची ठरली. सध्या या भागात मेट्रोच्या कामामुळे आधीच वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यात या कोंडीने घोडबंदरकरांची आणखी डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले. सकाळी ८ च्या सुमारास घोडबंदरच्या दिशेने जात असलेला ट्रक आनंदनगर येथे वळण घेत असताना त्याच ठिकाणी बंद पडला. त्यामुळे घोडबंदरकडे जाणारी आणि घोडबंदरवरून ठाण्याच्या दिशेने येणारी अशा दोन्ही मार्गिका ठप्प झाल्या. त्यानंतर, बुस्टरच्या साहाय्याने हा ट्रक बाजूला काढण्यात आला. तोपर्यंत दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. ही कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना ११ वाजले. भरपावसात अंगावर रेनकोट घालून ते ठिकठिकाणी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. परंतु, तरीसुद्धा ही कोंडी फोडण्यासाठी त्यांनाही तीन तासांची पराकाष्ठा करावी लागली. या मार्गावरील रस्त्यावर, उड्डाणपुलावर आणि सेवारस्त्यांवर खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी त्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळेही वाहतूककोंडीत अधिकची भर पडलेली दिसून आली.
या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असताना दुसरीकडे भिवंडी-नाशिक महामार्गावर माजिवड्याच्या दिशेने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. त्यामुळे भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरही वाहतूक जॅम झाली होती. खारेगाव टोलनाक्याजवळ एका तासाच्या कालावधीत दोन ट्रक बंद पडल्याने या मार्गावरही वाहतूककोंडी झाली होती. तसेच पुढे मानकोली येथे या महामार्गावर खड्डे असल्याने आणि साकेत पुलावरही ते पडल्याने कोंडीत आणखीनच भर पडली. त्यात अवजड वाहनांची वाहतूकही याच कालावधीत घोडबंदर आणि भिवंडीकडे जाणाºया महामार्गावर आल्याने वाहतूककोंडी आणखीन वाढली. ऐन कामावर जाण्याच्या वेळेसच सकाळी या तीन घटना टप्प्याटप्प्याने घडल्याने कामावर जाणाºया चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.

काँगे्रसने केले खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण
च्ठाणे : स्मार्ट सिटीचे स्वप्न बघणाºया ठाणे महापालिका हद्दीतील घोडबंदर परिसरात रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

च्महापालिकेतील निद्रीस्त सत्ताधाऱ्यांना खड्ड्यांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशिष गिरी यांनी आनंदनगर येथील सेवारस्त्यावर वृक्षलागवड करून आणि स्मार्ट रांगोळ्या काढून ठाणे महापालिकेविरोधात निदर्शने करून अनोखे आंदोलन केले.

रस्त्यांवर वाहनांची वाढत असलेली संख्या, मेट्रोचे सुरूअसलेले काम, खड्ड्यांमुळे वाहतुकीचा मंदावलेला वेग आणि त्यात घोडबंदर आणि खारेगाव टोलनाक्यांवर वाहने बंद पडल्याने वाहतूककोंडी झाली होती. आता हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
- अमित काळे, पोलीस
उपायुक्त, वाहतूक विभाग

Web Title: Traffic congestion due to pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.