दोन हजारांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
By Admin | Updated: September 29, 2015 23:46 IST2015-09-29T23:46:13+5:302015-09-29T23:46:13+5:30
पार्किंगसाठी दोन हजारांच्या खंडणीची मागणी करून ती दिली नाही म्हणून रिक्षांची मोडतोड केल्याची घटना इंदिरानगर भागात घडली

दोन हजारांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
ठाणे : पार्किंगसाठी दोन हजारांच्या खंडणीची मागणी करून ती दिली नाही म्हणून रिक्षांची मोडतोड केल्याची घटना इंदिरानगर भागात घडली. याप्रकरणी संजय जाधव, समीर महाशब्दे आणि विनोद नेपाळी या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली.
इंदिरानगर, रूपादेवीपाडा, जोश इमारतीसमोरील जय महाराष्ट्र गल्लीमध्ये रिक्षातळाजवळ विनोद यादव या सुरक्षारक्षकाजवळ संजय आणि समीर या दोघांनी मिळून रिक्षा पार्किंग करतो म्हणून १५ आणि १९ सप्टेंबर रोजी दोन हजारांची मागणी केली. ती देण्यास नकार दिल्याने २८ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वा.च्या सुमारास या दोघांसह विनोद आणि अन्य एकाने दरमहा मागणी केलेली खंडणीची रक्कम दिली नाही म्हणून त्या ठिकाणी उभ्या केलेल्या
रिक्षा आणि कारवर दगडफेक करून काचा फोडल्या.
याबाबतची तक्रार पोलिसांकडे केल्यास ठार मारण्याची धमकीही त्यांनी यादवला दिली होती.
दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर तिघांनाही सोमवारी रात्री अटक करून त्यांच्या चौथ्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)