चोवीस तास पाण्यासाठी ठामपाची कोट्यवधींची पंचवार्षिक योजना
By Admin | Updated: March 23, 2017 01:33 IST2017-03-23T01:33:20+5:302017-03-23T01:33:20+5:30
ठाणे महापालिकेने पाच वर्षांचे व्हिजन ठाणे तयार केले असून त्याचाच एक भाग म्हणून पाण्याचे नियोजन, वितरणव्यवस्था मजबूत करण्यासाठी

चोवीस तास पाण्यासाठी ठामपाची कोट्यवधींची पंचवार्षिक योजना
अजित मांडके / ठाणे
ठाणे महापालिकेने पाच वर्षांचे व्हिजन ठाणे तयार केले असून त्याचाच एक भाग म्हणून पाण्याचे नियोजन, वितरणव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि ठाणेकरांना समान पद्धतीने पाणी देण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या योजनेतून ठाणेकरांना पुढील पाच वर्षांत २४ बाय ७ पाणीपुरवठा आणि वितरणव्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी पुढील पाच वर्षांच्या या दोनही योजनांसाठी कोट्यवधींची आर्थिक तरतूद केली जाणार आहे. त्यानुसार, या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश यंदाच्या अर्थसंकल्पातही केला आहे.
ठाणे शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २००, एमआयडीसी ११०, स्टेम ११० आणि बीएमसीकडून ६० एमएलडी असा पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण झाली की, २४ तासांचे शटडाउन घ्यावे लागते. परंतु, पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४८ तासांचा कालावधी जातो, त्यामुळे अनेक भागांना कमी दाबाने पाणी येत असते. ठाण्याच्या भौगोलिक रचनेनुसार एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे खाडी असून भूपृष्ठाचा समतोल योग्य असला तरीदेखील केवळ साठवणुकीअभावी वितरणव्यवस्थेत समतोल राखला जात नसल्याचे पालिका मान्य करीत आहे.
त्यामुळेच आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी साठवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी शहरात नव्याने १२ जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार, कळवा भागात ६, आनंदनगर-कासारवडवली १, सिद्धाचल १, बाळकुम २, जॉन्सन १ आदी जलकुंभांचे काम सुरू असून यातील काही जलकुंभांची कामे पूर्ण झाली असून काहींची कामे अंतिम टप्प्यात, तर काही नव्याने सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)