नागपूरच्या पाच संस्थांचा कुलकर्णींना पाठिंबा
By Admin | Updated: November 17, 2016 07:16 IST2016-11-17T07:16:01+5:302016-11-17T07:16:01+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ साहित्यिक मदन कुलकर्णी यांना नागपूरच्या पाच साहित्यिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

नागपूरच्या पाच संस्थांचा कुलकर्णींना पाठिंबा
डोंबिवली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ साहित्यिक मदन कुलकर्णी यांना नागपूरच्या पाच साहित्यिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या संस्थांनी कुलकर्णी यांना प्रथम क्रमांकाचे मत द्यावे, असे आवाहनही केले आहे.
कुलकर्णी यांना पाठिंबा देणाऱ्या संस्थांमध्ये साहित्य कला सेवा मंडळ, पद्मगंधा साहित्य संस्था, साहित्य विहार संस्था, रसिकराज सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था आणि अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था यांचा समावेश आहे.
डोंबिवलीत होणाऱ्या या संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात कुलकर्णी यांच्याव्यतिरिक्त अन्य तीन साहित्यिक आहेत. त्यापैकी अक्षयकुमार काळे, जयप्रकाश घुमटकर आणि प्रवीण दवणे यांनी डोंबिवलीत येऊन काही मंडळींच्या भेटीगाठी घेतल्या, तर दवणे यांनी संमेलन आयोजक समितीच्या बैठकांपासून मुलाखतींपर्यंत मजल मारली आहे. दवणे यांची मुलाखत ‘श्रीकला संस्थे’ने घेतली. या संस्थेने अन्य उमेदवारांच्याही मुलाखती घ्याव्यात, अशी अपेक्षा साहित्यिक व वाचकांकडून व्यक्त होत आहे.
कुलकर्णी यांनी अजूनही डोंबिवलीला भेट दिलेली नाही. ९ नोव्हेंबरनंतर ते शहरात येतील, असे सांगण्यात आले होते. परंतु, त्यांचे येणे झालेले नाही. त्यांची सगळी मदार नागपूरकडील साहित्यिक संस्था व मतदारांवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाच साहित्य संस्था या नागपूरच्या आहेत. या साहित्य संस्थांनी एक आवाहन प्रसिद्ध केले आहे. त्यात कुलकर्णी यांच्या साहित्यसेवेचा उल्लेख आहे. कुलकर्णी हे विदर्भ साहित्य संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. संशोधन व समीक्षा हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. प्राचीन मध्ययुगीन साहित्याविषयी त्यांना आस्था आहे. नव्या साहित्य प्रवाहाचे ते स्वागत करतात. नव्या साहित्याचा वेध घेत असताना साहित्यात पुन:पुन्हा त्याचत्याच विषयांची पुनरावृत्ती ते टाळतात. कविता प्रती, मुक्तोबोधांची कविता, दलित कवितेतील सूर्यप्रतिमा, कविता आणि सांगीतिक प्रतिमा, मराठीतील उपेक्षित गझलकार ही त्यांची कवितेसंदर्भातील पुस्तके पाहिली, तर नवा साहित्य विचार त्यांच्या लेखनातून दिसून येतो.