खड्ड्यांमुळे मंदावली डोंबिवलीतील वाहतूक
By Admin | Updated: June 29, 2017 02:45 IST2017-06-29T02:45:55+5:302017-06-29T02:45:55+5:30
शहरात तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पूर्व, पश्चिम परिसर व ग्रामीण भागांतील

खड्ड्यांमुळे मंदावली डोंबिवलीतील वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरात तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पूर्व, पश्चिम परिसर व ग्रामीण भागांतील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. वाहनांच्या रांग लागत असल्याने कोंडीत भर पडत आहे. पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने अपघातांच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवर काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने काही कामे स्थगित ठेवावी लागली आहेत. काही रस्त्यांची एकच लेन काँक्रिटची झाली आहे. उर्वरित रस्त्यांवर डांबरचा पॅच आहे. अशा ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी, अशा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाच्या संततधारेमुळे त्यात पाणी साचत असून ते खड्डे मोठे होत आहेत. पावसाने उघडीप घेताच तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. खड्ड्यांमधील दगड रस्त्यावर पसरत असल्याने वाहनांचे टायर पंक्चर होणे तसेच दुचाकी घसरून अपघाताची शक्यता आहे.
पूर्वेतील भगतसिंग रोडवरील गतिरोधकालगतच मोठा खड्डा पडला आहे. त्याच रोडवर गजानन महाराज मंदिरासमोर रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे खड्डा असल्याची भीती असल्याने वाहनचालक गाडीचा वेग कमी करतात. टिळक पथावरील टिळक पुतळ्याजवळ रस्त्याची लेव्हल नसल्याने दुचाकी व तीनचाकी वाहनांची चाके अडकण्याची शक्यता आहे. मानपाडा रोडवरून चिपळणूकर रोडकडे वळताना पेव्हर ब्लॉक आणि डांबरी रस्ता यात खड्डा पडला आहे. तेथेच एका ठिकाणी ड्रेनेजचे झाकण अर्धवट खड्ड्यात अडकले आहे. त्यामुळेही खड्डा झाला आहे. टाटा पॉवर लाइनमार्गे कस्तुरी प्लाझाजवळही पेव्हर ब्लॉकमुळे खड्डा निर्माण झाला आहे.
टंडन रोडवरील काँक्रिटीकरणाची कामे उन्हाळ्यात करण्यात आली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला तसेच रामभाऊ म्हाळगी चौक आणि दशरथ पुजारी चौकात योग्य पद्धतीने पेव्हर ब्लॉक लावण्यात आलेले नाहीत. अनेक ठिकाणी लेव्हल तसेच योग्य उतार दिलेला नाही. परिणामी, खोलगट भागात पाणी साचते. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक खचले आहेत. केळकर रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम सफाईदारपणे झालेले नाही. रस्त्याच्या दोन लेन लेव्हलमध्ये नाहीत. त्याचा सर्वाधिक त्रास रिक्षाचालक व दुचाकीचालकांना होत आहे. या रस्त्यावरील रिक्षा स्टॅण्डमुळे आधीच येथे कोंडी होते. आता अयोग्य रस्त्यामुळेही त्यात भर पडत आहे.
उर्सेकरवाडीतील पेव्हर ब्लॉक ठिकठिकाणी पुन्हा उखडले आहेत. त्याचा त्रास पादचाऱ्यांना होत आहे. रिक्षा आणि दुचाकीची सतत वर्दळ असल्याने वाहन चालवताना चालकांची कसोटी लागते. सारस्वत कॉलनीमधील विवेकानंद सोसायटीजवळील रस्त्याला मधोमध खड्डे पडले आहेत. बाराबंगल्यातील रस्त्याच्या उतारामुळे पावसाबरोबर रेतीही वाहून आली आहे. ती पंचायत विहिरीजवळ ठाकुर्लीकडे जाणाऱ्या वळणावर साचली आहे. त्यामुळे दुचाकीचालक घसरून अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
पश्चिमेतील दीनदयाळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळेही नागरिकांची व वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रेल्वेच्या फलाट क्रमांक-१ला समांतर असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम आता पावसाळ्यातच पूर्ण झाले आहे. महात्मा गांधी उद्यानासमोर ऐन पावसाळ्यात पेव्हर ब्लॉक टाकण्यात येत आहे. पु.भा. भावे सभागृहापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाचा आहे. त्यानंतर, उद्यानाच्या अखेरपर्यंत एकाच बाजूस पेव्हरब्लॉक लावण्यात आले आहेत.
पश्चिमेतील डी बिल्डिंग रस्ता, आनंदनगर-ठाकुरवाडीतील छोटे रस्ते, या ठिकाणीही खड्डे आहेत. तेथे काही भागात पेव्हर ब्लॉक टाकले असून ते खडबडीत झाले आहेत. आयरे रोड भागातील रस्त्यांवर माती साचली आहे. पावसाच्या पाण्यात ती वाहून न गेल्याने तेथे चिखल झाला आहे. अनेक ठिकाणी गटारांमधला गाळ काढला असून तो रस्त्यावर टाकला होता, तो वेळेत उचलला गेला नाही, त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे तो रस्त्यावर सर्वत्र पसरला. आजदे-सागर्लीच्या भागातही खड्डे पडले आहेत.