चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती
By अजित मांडके | Updated: April 20, 2024 16:41 IST2024-04-20T16:40:28+5:302024-04-20T16:41:41+5:30
घोडबंदर भागातील किंग कॉंग नगर भागात ओम साई चाळीतील सहा घरांचा भाग पडल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे.

चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती
अजित मांडके ,ठाणे : घोडबंदर भागातील किंग कॉंग नगर भागात ओम साई चाळीतील सहा घरांचा भाग पडल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे. यातील घरांचा भाग हा धोकादायक स्थितीत आला आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. तर या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी बांधून बॅरीकेटींग करण्यात आले आहे.
घोडबंदर भागातील विजय नगरी येथील किंग कॉंग नगर भागात ओम साई चाळ आहे. या ठिकाणी असलेल्या सहा घरांचा काही भाग शनिवारी सकाळी पडल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती. त्यानुसार घटनेचे गांभीर लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागासह आपत्ती व्यवस्थापन विभाग व प्रभाग समितीमधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी देखील घरांचे नुकसान झाले आहे. तर या घरांच्या ठिकाणी धोकादायक स्थितीत असलेला भाग अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाडून टाकला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मार्फत धोकापट्टी बांधून बॅरीकेटींग करण्यात आले आहे. तर ओम साई या चाळीतील एकूण १० रुम सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तात्पुरत्या स्वरुपात रिकामी करण्यात आले आहेत. त्यानंतर येथील १० रुम मधील रहिवाशांनी त्यांची राहण्याची व्यवस्था आपल्या नातेवाईकांकडे केली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.