कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेला कायमचा लाल दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:04 AM2018-01-17T01:04:33+5:302018-01-17T01:04:38+5:30

कल्याण रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडल्यावर नजरेस पडतो तो बकालपणा. अनेक वर्षे ही स्थिती असून त्यात किंचितही बदल झालेला नाही. तो होण्यासाठी नागरिक आणि यंत्रणांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे.

The signal system in Kalyan should be permanently red lighted | कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेला कायमचा लाल दिवा

कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेला कायमचा लाल दिवा

Next

कल्याण रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडल्यावर नजरेस पडतो तो बकालपणा. अनेक वर्षे ही स्थिती असून त्यात किंचितही बदल झालेला नाही. तो होण्यासाठी नागरिक आणि यंत्रणांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक परिसराची निवड झाली आहे. मुळात येथील सध्याची परिस्थिती बदलण्याचेच मोठे आव्हान असल्याने ते स्मार्ट कधी आणि कसे होणार, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. स्थानक परिसरात वाहतुकीला कुठल्याही प्रकारची शिस्त नाही. रिक्षाचालक तर आपल्याला रस्ता आंदण दिल्याप्रमाणे वागतात. बिनधास्त रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करतात. त्यांच्यावर कधी कारवाई होताना दिसत नाही. यंत्रणांबरोबरच रिक्षा संघटनेचे पदाधिकारीही केवळ बघ्याची भूमिका घेतात.
एकीकडे वाहतूककोंडी जटिल होत असताना दुसरीकडे वाहतूक सुविधांची बोंबाबोंब असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या घडीला शहरात एकही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नाही. याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी केडीएमसीची आहे. परंतु, याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने सिग्नलचे खांब आता शहरातून गायब झाले आहेत. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे ते काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. वाहतुकीच्या सुविधा पुरवण्याचे काम केडीएमसीचे आहे, तर वाहतूक नियमनाचे काम पोलिसांचे आहे. सुविधांबाबत वाहतूक शाखेकडून केडीएमसीला वारंवार पत्रव्यवहार केला जातो. मात्र, याची दखल घेतली जात नसल्याचे वाहतूक पोलीस विभागाचे म्हणणे आहे. सुविधा पुरवण्याकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता केडीएमसीला वाहतूकव्यवस्थेचे कितपत गांभीर्य आहे, याची प्रचीती यानिमित्ताने येते.
फतवे कागदावरच
वाहतूककोंडीच्या धर्तीवर केडीएमसी आणि वाहतूक शाखेकडून अनेक फतवे जारी केले जातात. परंतु, या फतव्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होतेच, असे नाही. केडीएमसीकडून अप्रत्यक्षरीत्या सहकार्य मिळत नाही, अशी ओरड वाहतूक शाखेकडून होत असली तरी वाहतूक सुरळीत चालावी, यासंदर्भात जारी केल्या जात असलेल्या अधिसूचना आणि फतव्यांची त्यांच्याकडून कितपत अंमलबजावणी होते, हादेखील संशोधनाचा विषय आहे.
रेल्वेस्थानकाला जोडणारे बैलबाजार, गुरुदेव हॉटेल मार्ग, पुष्पराज हॉटेल मार्ग, शिवाजी चौक आणि मुरबाड रोड हे एकदिशा मार्ग करणे जरुरीचे आहे. त्याप्रमाणे मागणी होत असताना याबाबतची अंमलबजावणीही होताना दिसत नाही.

पूर्वेला नेहमीच सापत्न वागणूक
पश्चिम-पूर्व परिसर जोडण्यासाठी दीपक हॉटेल ते गणपती चौक काटेमानिवलीनाका असा उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली आहे. पूर्वेला नेहमीच सापत्न वागणूक मिळाली आहे. पश्चिमेच्या तुलनेत पूर्व भाग हा नेहमीच मागास राहिला असून महापालिकेने सातत्याने या भागावर अन्यायच केला आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे स्थानकात एमएमआरडीएने २००० मध्ये स्कायवॉक बांधला आहे. आता हा स्कायवॉक पाडून त्या ठिकाणी सॅटीस उभारण्याचे प्रस्तावित आहे. हा सॅटीस प्रकल्प केवळ कल्याण पश्चिमेपुरता मर्यादित न ठेवता या माध्यमातून पूर्व-पश्चिम भाग जोडण्यात यावा, जेणेकरून दळणवळणासाठी सोयीचे ठरणार आहे. - जगन्नाथ शिंदे, आमदार

कल्याणमध्ये १२ हजार रिक्षा आहेत. रिक्षांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रेल्वे स्थानकात असलेला रिक्षातळ अपुरा पडू लागला आहे. कल्याण पूर्व-पश्चिम जे रिक्षातळ आहेत, ते बहुतांश रेल्वेच्या हद्दीत आहेत. रेल्वेच्या हद्दीत तीन रिक्षातळ आहेत. तर, बेतुरकरपाडा या ठिकाणी जाणाºया प्रवाशांसाठी स्थानकाच्या परिसराबाहेर महापालिकेच्या हद्दीत रिक्षातळ आहे. या ठिकाणी दोन रांगा लावण्यास परवानगी दिली आहे. चार ते पाच रिक्षा संघटना आहेत. त्यांचे पदाधिकारी हे राजकीय पक्षांशी निगडित असल्याने कारवाईदरम्यान पोलिसांवर दबावतंत्र अवलंबले जाते.

पश्चिमप्रमाणे पूर्वेला वाहतूककोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवते. येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी काटेमानिवली-कोळसेवाडी रस्ता व्हाया म्हसोबा चौक सिद्धार्थनगर असा ८० फूट रस्ता करण्याचे प्रस्तावित होते. परंतु, यामध्ये ९०० कुटुंबे विस्थापित होणार असल्याने आमदार गणपत गायकवाड आणि आमदार जगन्नाथ शिंदे यांनी पुनर्वसनाची मागणी लावून धरली.विधिमंडळ अधिवेशनातही हा विषय उपस्थित करण्यात आला. परंतु, याबाबत ठोस निर्णय न झाल्याने अद्यापही हा रस्ता ४० फूट इतकाच राहिला आहे. विशेष बाब म्हणजे कोळसेवाडी गणपती चौक ते काटेमानिवली या रेल्वेस्थानकापासून सुरू होणाºया रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसून येते. तब्बल १५ फूट रस्ता हा अतिक्रमणाने व्यापला जातो. पूर्वेकडील भागात वाहनतळ नाही. रेल्वेच्या हद्दीत वाहनतळ आहे. परंतु, महापालिकेने तसे नियोजन न केल्याने या रस्त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यात केडीएमटीने या भागातून बस सुरू केली आहे. आधीच रिक्षा आणि फेरीवाल्यांचे झालेले अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यावरून मार्गस्थ होणाºया केडीएमटीच्या बसमुळे सायंकाळच्या सुमारास प्रचंड ‘कोंडी’ होते. या कोंडीमध्ये वाहनांची धडक बसून काही पादचारी जखमी झाल्याचेही प्रकार घडले आहेत. प्रारंभी येथील रिक्षाचालकांनी केडीएमटीला विरोध केला होता. रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यावर बस चालवा, अशी मागणी त्यांची होती. पूर्वेकडील भाग हा नेहमीच केडीएमसीकडून दुर्लक्षित राहिल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींचाही आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत स्थानक परिसराला प्राधान्य
स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण रेल्वेस्थानक परिसराच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहे. यामध्ये स्कायवॉक हटवला जाणार असला, तरी तो पूर्णपणे काढला जाणार नाही. आवश्यकतेनुसार स्कायवॉक ठेवला जाणार आहे. सॅटीस प्रकल्पही उभारण्यात येणार असून एकंदरीतच वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच वाहतूक विभागाकडून ज्या सुविधांची मागणी केली जाते, त्याची पूर्तता वेळोवेळी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुविधा दिल्या जात नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे.
- प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, केडीएमसी

टिटवाळा तीर्थक्षेत्रातही घुसमट कायम
टिटवाळा शहर अद्यापही सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. मध्य रेल्वेच्या या स्थानकाबाहेर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे या ठिकाणी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. रेल्वेस्थानकातून बाहेर पडल्यावर टिटवाळा महागणपती मंदिराकडे जाणाºया रस्त्याची रचना केडीएमसीकडून वर्षानुवर्षे सुरूच आहे. अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. रेल्वेस्थानक ते टिटवाळा मंदिर या एक ते दीड किलोमीटर अंतरावर कुठेही स्वच्छतागृह नाही. स्थानक परिसराच्या बाहेर नियोजन नसल्याने हा परिसर बकाल झाला आहे. महापालिकेत असूनही या शहराला भाजी मार्केट तसेच फिश मार्केट उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावरच पदपथाच्या बाजूला भाजीविक्रे त्यांचे ठेले मांडले जातात. स्थानकाबाहेरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना या बेकायदा फेरीवाल्यांचा कब्जा असतो. न्यायालयाने स्थानकाच्या १५० मीटर परिसरात व्यवसाय करण्यास घातलेले निर्बंध या ठिकाणी धुडकावल्याचे दिसून येते. आठवडाबाजारात तर येथील परिस्थिती अधिकच गंभीर बनलेली असते. स्थानकाच्या परिसरात रिक्षातळ असताना त्याच्याबाहेरही दोन्ही बाजूंना रिक्षा या अस्ताव्यस्त उभ्या असतात.

तो निर्णय वरिष्ठांचा : आगारातून बाहेर पडताना आणि आतमध्ये येताना बसला रिक्षांच्या अतिक्रमणाला तोंड द्यावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. प्रसंगी वादही होतात. त्यामुळे वाहतूक शाखेला पत्रव्यवहार करून पोलीस कर्मचाºयांची मागणी केली जाते. आगाराच्या प्रवेशद्वाराची दिशा यापूर्वी बदलण्यात आली, परंतु त्यातून खाजगी वाहने बिनदिक्कतपणे प्रवेश करू लागल्याने आगाराची सुरक्षा धोक्यात आली होती. त्यामुळे बसच्या येण्याजाण्याचे नियोजन पूर्ववत करण्यात आले. आगार अन्यत्र हलवायचे की नाही, हे सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असल्याने यावर प्रतिक्रिया देता येणार नाही.
- प्रतिभा भांगरे, व्यवस्थापक, कल्याण बस आगार

त्या अहवालाचे काय झाले?
माजी अतिरिक्त सहायक आयुक्त अमिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने वाहतूककोंडीच्या मुद्यावर अहवाल तयार केला होता. त्याचे काय झाले. त्यातच कल्याण बस आगारदेखील अन्यत्र हलवण्यात येणार होते. त्याचाही ठोस निर्णय झालेला नाही. आता बैलबाजार परिसरात मेट्रो आणण्याचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडणार आहे. ही मेट्रो दुर्गाडी चौकमार्गे भवानी चौकात आणणे सोयीस्कर होईल. केडीएमटीचा डेपो जवळ असल्याने तो परिसर योग्य आहे.
- प्रक ाश पेणकर, अध्यक्ष, ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघ

कोंडीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल
रेल्वेस्थानक परिसरातील विकासाचा अंतर्भाव स्मार्ट सिटीत केलेला आहे, त्यामुळे येथील वाहतूककोंडीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल. वाहनांची संख्या वाढली, पण रस्त्याच्या आकारात बदल झालेला नाही. ठाण्याच्या धर्तीवर स्थानक परिसरात एकच रिक्षा आणि बसतळ असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आता स्मार्ट सिटी प्रकल्पात नियोजन केले जाणार आहे. त्यात समस्या निकाली निघेल.
- नरेंद्र पवार, आमदार

Web Title: The signal system in Kalyan should be permanently red lighted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.