रेल्वे भुयारी मार्गाच्या रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: November 17, 2016 07:26 IST2016-11-17T07:26:04+5:302016-11-17T07:26:04+5:30
बदलापूर बेलवली परिसरात पूर्व - पश्चिम विभागाला जोणारा महत्त्वाच्या भुयारी मार्गावर पाणी साचत असल्याने हा रस्ता नेहमीच धोकादायक राहिला आहे.

रेल्वे भुयारी मार्गाच्या रस्त्याची दुरवस्था
बदलापूर : बदलापूर बेलवली परिसरात पूर्व - पश्चिम विभागाला जोणारा महत्त्वाच्या भुयारी मार्गावर पाणी साचत असल्याने हा रस्ता नेहमीच धोकादायक राहिला आहे. मात्र पावसाळा संपल्यानंतर हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सतत पाणी साचून राहिल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे या रस्त्याला दुरुस्तीची गरज आहे.
जून महिन्यात पावसाच्या सुरूवातीपासूनच येथे पाणी साचायला सुरूवात झाली होती. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात अनेक वाहने अडकण्याचे प्रकारही घडले होते. त्यामुळे बदलापूर पश्चिमेतून पूर्वेतील कात्रप वा कर्जत महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना कायम शहरातील एकमेव उड्डाण पुलावरून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिकची भर पडत होती. भुयारी मार्ग हा उत्तम पर्याय होता. मात्र रेल्वेच्या अभियांत्रिकी चुकांमुळे दुरूस्तीनंतरही भुयारी मार्ग पाण्याखालीच होता. आॅक्टोबरच्या अखेरीस भुयारी मार्गातील पाणी आटल्याने अखेर भुयारी मार्ग वाहनांसाठी खुला झाला आहे. मात्र पाच महिने पाणी साचल्याने येथील रस्त्यावरील काँक्रीट अक्षरश: वाहून गेले आहे.
अनेक दुचाकी चालक येथे घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन हा रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित करण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)