भरधाव ट्रकची सहा रिक्षांना धडक
By Admin | Updated: June 24, 2016 03:40 IST2016-06-24T03:40:15+5:302016-06-24T03:40:15+5:30
रिक्षा स्टँडमध्ये भरधाव ट्रक घुसल्याने पाच रिक्षा आणि एका तीनचाकी टेम्पोचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकाजवळ घडली

भरधाव ट्रकची सहा रिक्षांना धडक
कल्याण : रिक्षा स्टँडमध्ये भरधाव ट्रक घुसल्याने पाच रिक्षा आणि एका तीनचाकी टेम्पोचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकाजवळ घडली. त्यात पाच जण किरकोळ जखमी झाले. कोळसेवाडी पोलिसांनी बेजबाबदार ट्रकचालकाला अटक केली आहे.
रिक्षाचालक मनोज पावशे (४२) रिक्षास्टँडवर दोन प्रवासी घेत होते. इतक्यात उल्हासनगरहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे तो रिक्षा स्टँडमध्ये घुसला. त्यामुळे पावशे यांच्या डोक्याला दुखापत झाली. तर रिक्षातील दोन प्रवाशांसह आणखी दोघे जखमी झाले.
एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला मुंबईतील सायन रु ग्णालयात तर इतर चौघांना कल्याणच्या मेट्रो रु ग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर गुरु वारी दुपारी त्यांना घरी सोडल्याचे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांनी सांगितले. या अपघातात पाच रिक्षा व एका टेम्पोचे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघाता झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, ट्रकचालकाने मद्यपान केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघातानंतर ट्रकचालक गीते (४०) घटनास्थळाहून पळून गेला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. ट्रकचा ब्रेकफेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला. दरम्यान, पावशे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गीतेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता जखमींची व ट्रकचालकाचे नाव देण्यास पोलीस हवालदार साबळे यांनी टाळले. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.