नेवाळी विमानतळाची जागा परत द्या

By Admin | Updated: January 11, 2016 02:33 IST2016-01-11T02:33:15+5:302016-01-11T02:33:15+5:30

ब्रिटिशकालीन नेवाळी (ता. कल्याण) विमानतळाची जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे ती शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धर

Return the space of the Naval Airport | नेवाळी विमानतळाची जागा परत द्या

नेवाळी विमानतळाची जागा परत द्या

सुरेश लोखंडे,  ठाणे
ब्रिटिशकालीन नेवाळी (ता. कल्याण) विमानतळाची जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे ती शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली; मात्र त्या जागेची मालकी नौदलाकडे असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर अधिक बोलणे टाळल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील ही चर्चा पुन्हा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वारस आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांना ने-आण करण्यासाठी व मालवाहू विमाने उतरविण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी येथे विमानतळ सुरू केले होते. सुमारे सतराशे एकरच्या परिसरातील या विमानतळाचे अस्तित्व तत्कालीन धावपट्टीद्वारे आजही सिद्ध होत आहे.
या विमानतळासाठी तत्कालीन शेतकऱ्यांकडून ब्रिटिशांनी या शेतजमिनी प्राप्त केल्या होत्या. विमानतळाचा वापर करणे थांबल्यानंतर त्या जमिनी परत देण्याचा करार झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची ही बाजू मांडण्याचा प्रयत्न संबंधित लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केला. यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या डीपीसीतही तो झाला. मात्र, तो विषय आता नौदलाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर बोलणे टाळले.
या विमानतळाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्यास भाग पाडले होते. आता ही जागा संपूर्णपणे नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती आता त्यांच्याकडे मिळेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाने संबंधित शेतकऱ्यांना या जमिनीचा संपूर्ण मोबदला दिल्याचेही सांगितले जात आहे. तरीदेखील, संबंधित शेतकऱ्यांचे वारस शोधण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला असता केवळ १९ शेतकऱ्यांचे वारस आढळून आले. उर्वरित शेतकऱ्यांचे वारस मात्र आढळत नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

Web Title: Return the space of the Naval Airport