‘सावरकरांवरील आक्षेपांचे निराकरण करावे लागणे दुर्दैवी’
By Admin | Updated: April 24, 2017 02:12 IST2017-04-24T02:12:33+5:302017-04-24T02:12:33+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीवर चिखलफेक करण्यात काही जणांना धन्यता वाटते. त्यांची देशभक्ती, निर्भयता, हेतू यावर शिंतोडे उडणे हे आपले दुर्भाग्य आहे.

‘सावरकरांवरील आक्षेपांचे निराकरण करावे लागणे दुर्दैवी’
ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीवर चिखलफेक करण्यात काही जणांना धन्यता वाटते. त्यांची देशभक्ती, निर्भयता, हेतू यावर शिंतोडे उडणे हे आपले दुर्भाग्य आहे. इतर कोणत्याही देशात स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या थोर व्यक्तिंवर आक्षेप आणि निराकरण असे कार्यक्रम झालेले ऐकले आहेत का? मात्र आपण स्वा.सावरकरांवरील आक्षेप आणि निराकरण या विषयावर परिसंवाद घेण्यात शक्ती दवडतोय, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल, असे स्पष्ट मत डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केले.
गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात रविवारी ‘सावरकरांवरील आक्षेप आणि निराकरण’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. १९११ ते १९४८ या कालावधीत सावरकरांनी मांडलेले विचार, भूमिका, कृती यावर आक्षेप घेतले जातात. यातील काही आक्षेप ते जिवंत असतानाच घेतले होते आणि विशेष म्हणजे त्याचे निराकरण स्वत: सावरकरांनी केले. स्वातंत्र्य, हिंदुत्व , विज्ञाननिष्ठा आणि मानवतावाद या सावरकरांच्या जीवननिष्ठा तर भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श लक्षात घेतल्यास त्यांच्यावर आक्षेप घेणे किती निराधार, कपोलकल्पित आणि हास्यास्पद आहे, हे लक्षात येते. मुख्य म्हणजे स्वा.सावरकरांवर आक्षेप घेणारी मंडळी स्वत: प्रामाणिक आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे गोडबोले म्हणाले.
सावरकर झाले नसते तर पाकिस्तानचा आकार आहे त्यापेक्षा मोठा झाला असता आणि अखंड पाकिस्तानच्या प्रक्रियेला खूप वेग आला असता. ब्रिटीश येथून गेल्यावर ती जागा मुस्लिम घेतील ही भीती लक्षात घेऊन सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे शब्द वापरून भलमोठं तत्वज्ञान उभ केलं, असे प्रतिपादन अरविंद कुलकर्णी यांनी केले. बंदीवासात असलेल्या सावरकरांवर झालेल्या अनेक आक्षेपांचे प्रा. गजानन नेरकर यांनी निराकरण केले. (प्रतिनिधी)