महाराष्ट्र चळवळीत शेकापचे योगदान
By Admin | Updated: August 4, 2014 00:29 IST2014-08-04T00:29:14+5:302014-08-04T00:29:46+5:30
किरण माने : शेतकरी कामगार पक्षाचा ६६ वा वर्धापन दिन उत्साहात

महाराष्ट्र चळवळीत शेकापचे योगदान
कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महाराष्ट्र राज्य निर्मितीत शेतकरी कामगार पक्षाचे अमूल्य योगदान असल्याचे मत सातारा येथील अॅड. किरण माने यांनी आज, रविवारी व्यक्त केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जिल्हा सहचिटणीस भारत पाटील मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते. तत्पूर्वी, सकाळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव पाटील यांच्या हस्ते खासबाग, टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयाजवळ ध्वजवंदन झाले. अॅड. किरण माने म्हणाले, श्रमिकांचे राज्य आणण्यासाठी या पक्षाने आंदोलन केले. काँग्रेसने १९२० ला भाषा व प्रांतरचनेचा ठराव केला पण, तो अंमलात आणला नाही. भाषावार प्रांतरचनेला काँग्रेसचा विरोध होता. यासाठी शेकापने महाराष्ट्र समिती स्थापन करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली. या चळवळीत १०५ हुतात्मे झाले तर सुमारे एक हजार जणांना तुरुंगवास भोगावा लागला. या लढ्याची सुरुवात कोल्हापुरातील बिंदू चौकातून झाली. त्याची दखल घेत त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे पुणे येथे दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र राज्य निर्मितीचे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे राज्य निर्मितीच्या लढ्याला यश हे या पक्षाचे आहे.
स्वागत जिल्हा सहचिटणीस दिलीपकुमार पाटील यांनी तर सुनीलकुमार सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास माजी महापौर शिवाजीराव कदम, बाबूराव कदम, दिगंबर लोहार, सुशांत बोरगे, सुभाष सावंत, बाबूराव पाटील, मधुकर हरेल, अशोक चव्हाण, स्वप्निल कदम, संग्राम माने, सुनंदा मोरे, दमयंती कडोकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजीराव जगदाळे यांनी आभार मानले.
५० जागा लढविणार...
येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ५० जागा लढविणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग संघटक मनीष महागांवकर यांनी शेकापमध्ये प्रवेश केला.