तूरडाळ कडाडल्याने हॉटेल्समधील मेन्यू महागले
By Admin | Updated: November 10, 2015 00:09 IST2015-11-10T00:09:50+5:302015-11-10T00:09:50+5:30
महाग झालेल्या तूरडाळीवरून बरेच राजकारण झाले. तरीही त्याचे भाव काही उतरले नाहीत. त्यातच आता डाळ कडाडल्याने हॉटेलमधील डिशेसच्या दरातही दहा टक्के दरवाढ झाली आहे

तूरडाळ कडाडल्याने हॉटेल्समधील मेन्यू महागले
जान्हवी मोर्ये, ठाणे
ठाणे : महाग झालेल्या तूरडाळीवरून बरेच राजकारण झाले. तरीही त्याचे भाव काही उतरले नाहीत. त्यातच आता डाळ कडाडल्याने हॉटेलमधील डिशेसच्या दरातही दहा टक्के दरवाढ झाली आहे. त्यामुळे घराबाहेर रिफ्रेंशमेंट घेणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
मुंबई परिसरात ७ हजार हॉटेल्स आहेत. या हॉटेल्स संघटनेचे जनरल
सेक्रेटरी सुकेश शेट्टी यांच्याकडे दरवाढीविषयी विचारणा केली असता
त्यांनी आठ ते दहा टक्के दरवाढ झाल्याचे मान्य केले. त्यासाठी त्यांनी तूरडाळीच्या भाववाढ कारणीभूत झाल्याचे सांगितले. डाळीचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात डाळ २०० रूपयांना बाजारात विकली जात आहे. तूरडाळच महाग झाली नसून इतर डाळींचे भावही वाढले आहे. मेंदूवडा, बटाटा वडा, सांबारमध्ये डाळ टाकली जाते. दालफ्राय आणि साधे वरण राईससोबत दिले जाते. यासाठीच नाईलास्तव दरवाढ करावी लागली आहे. तूरडाळीपूर्वी कांद्याच्या दरवाढीने रडविले होते. त्यावेळी दरवाढ केलेली नव्हती. मात्र, आता हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
ठाणे शहरात जवळपास हजार हॉटेल्स आहेत. हॉटेल्स संघटनेचे अध्यक्ष साई प्रसाद शेट्टी यांनी सांगितले की, एका ठराविक दराच्या खाली आम्ही कोणताही पदार्थ विकत नाही. तसेच दरवाढही कमी जास्त असू शकते. कुठे आठ टक्के तर कुठे दहा टक्के आहे. हॉटेलचा पसारा किती कमी अथवा जास्त आहे, तेथे येणाऱ्या ग्राहकाचा दर्जा पाहून दर ठरविले जातात. एखादे हॉटेल गार्डन रेस्टॉरंट असते. एखाद्या ठिकाणी २०० ग्राहक एकाचवेळी बसून जेवण नाश्ता करु शकतात. काही हॉटेल्समध्ये शाकाहारी तर काही ठिकाणी मांसाहारी असा बेत असतो. तर काही छोटे हॉटेल्स लोअर मिडल क्लासचा ग्राहक विचारात घेऊन आपले दर ठरवितात. ग्राहकांना आपल्याशी बांधून ठेवता यावे यासाठी काहीजण कमी दर आकारतात.