सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला!
By Admin | Updated: October 19, 2015 01:07 IST2015-10-19T01:07:33+5:302015-10-19T01:07:33+5:30
केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुतांश प्रभागांमध्ये बहुरंगी लढती असल्याने सगळयाच पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अपक्ष आणि विविध राजकीय पक्षांचे एकुण ७५० उमेदवार रिंगणात आहेत

सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला!
प्रशांत माने, कल्याण
केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुतांश प्रभागांमध्ये बहुरंगी लढती असल्याने सगळयाच पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अपक्ष आणि विविध राजकीय पक्षांचे एकुण ७५० उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक १९ उमेदवार प्रभाग क्रमांक ९४ आनंदवाडी प्रभागात असून २३ प्रभागांमध्ये पंचरंगी लढत पहावयास मिळणार आहे.
केडीएमसीच्या १२२ प्रभागांपैकी तीन प्रभागातील उमेदवार बिनविरोध तर अन्य दोन प्रभागांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ११७ प्रभागांत निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघार प्रक्रियेनंतर भाजप १०९, शिवसेना ११५, काँग्रेस ५६, राष्ट्रवादी ४५, मनसे ८५ , रिपाई ६, बसपा २५, बहुजन विकास आघाडी २०, कम्युनिस्ट पक्ष ४, राष्ट्रीय समाज पक्ष ८, मार्क्सवादी पक्ष १, भारीप बहुजन महासंघ ६, समाजवादी पक्ष २, पिपल्स रिपब्लिकन पक्ष १, फॉरवर्ड ब्लॉक ९, एमआयएम ६ आणि अपक्ष २५२ असे ७५० उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.
शिवसेना भाजपा स्वतंत्रपणे लढत असून आघाडी होऊनही काँग्रेस राष्ट्रवादीत सद्यस्थितीला उमेदवार उभे करण्यावरून बेबनाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे मनसे स्वबळावर नशीब आजमावत आहे. रिपाई भाजपाची युती
असली तरी जागावाटपावरून रिपाई नाराज आहे. तर डाव्या विचारसरणीचे पक्ष एकत्रित येऊन लढत आहेत. छोटया-मोठया आघाडयांमध्ये प्रस्थापित पक्षांची कसोटी लागणार आहे. बहुतांश प्रभागांमध्ये बहुरंगी लढत असून आढावा घेता कल्याण पुर्वेकडील आनंदवाडी प्रभागात १९ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा फैसला मतदार करणार आहेत.