भातसा प्रकल्पाचा वीजपुरवठा केला खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:05+5:302021-03-21T04:40:05+5:30
शेणवा : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन कार्यालयावर बारा लाखांच्या वीजबिल थकितप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ...

भातसा प्रकल्पाचा वीजपुरवठा केला खंडित
शेणवा : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन कार्यालयावर बारा लाखांच्या वीजबिल थकितप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वीजपुरवठा खंडित केला. यामुळे जलसंपदा विभागाच्या कार्यालयासह भातसा वसाहतीतील रहिवाशांना तीन दिवस अंधारात राहावे लागण्याची वेळ आली. दरम्यान, शनिवारी वीजबिल भरणा केल्याने खंडित पुरवठा सुरळीत करण्यात आला.
मुंबईला रोज दोन हजार एमएलडी पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण कार्यालयावर महावितरणच्या अभियंत्यांनी वीजबिल थकित प्रकरणी वीज खंडित करण्याची कारवाई केली. जलसंपदा कार्यालयाने दोन महिन्यांचे विजेचे तब्बल बारा लाखांचे थकित बिल वेळेवर न भरल्याने अखेर गुरुवारी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी भातसा धरणातून मुंबई व ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वीजपुरवठा खंडित झाल्याने भातसा धरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणाही बंद पडल्याने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
सरकारी कार्यालयावर शहापूर तालुक्यात प्रथमच वीज खंडित करण्याच्या कारवाईने खळबळ उडाली असून, भातसा धरणाच्या खंडित वीज कारवाईप्रकरणी भातसा धरण कार्यालयास महावितरणच्या कार्यालयातून कोणत्याही लेखी पत्राद्वारे लेखी सूचना न देता कारवाई झाल्याचा आरोप भातसा प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी व रहिवाशांनी केला आहे.
वीजबिल थकितप्रकरणी भातसा प्रकल्प कार्यालयास मेल व भ्रमणध्वनीद्वारे मेसेजने सूचित करण्यात येऊनही बिल भरणा ने केल्याने अखेर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागली.
- अविनाश कटकवार, उपअभियंता, महावितरण