डोंबिवलीतील प्रवाशांना रेल्वे देतेय जुन्या नोटा
By Admin | Updated: November 18, 2016 03:19 IST2016-11-18T03:19:17+5:302016-11-18T03:19:17+5:30
केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे.

डोंबिवलीतील प्रवाशांना रेल्वे देतेय जुन्या नोटा
डोंबिवली : केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. पण रेल्वेत त्या नोटा चालतील असे निर्देश आहेत. त्या स्वीकारण्याऐवजी डोंबिवलीतील रेल्वेचे कर्मचारी त्याच नोटा प्रवाशांना परत देत असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. प्रवाशाने दोन हजारांची नवी नोट दिल्यानंतरही तिकिट वितरकाने पासाचे एक हजार रुपये घेतल्यावर ५०० रुपयांच्या दोन जुन्या नोटा त्यांना दिल्या. त्या नाकारल्याने पास न काढता अखेर तिकीट काढून त्यांना प्रवास करावा लागतो आहे.
प्रवासी राजू चेक्का यांना पूर्वेतील रामनगर खिडकीवर हा कटू अनुभव आला. प्रथम श्रेणीचा पास काढत त्याचे एक हजार रुपये भाडे देण्यासाठी त्यांनी बुकींग क्लार्कला दोन हजारांची नवी नोट दिली. त्या कर्मचाऱ्याने राजू यांच्याकडून पासाचे हजार रुपये आकारल्यावर त्यांना ५०० रूपयांच्या दोन जुन्या नोटा देत पास देऊ केला. मात्र राजू यांनी त्याला आक्षेप घेतला. जर मी दोन हजारांची नवी नोट दिली आहे, तर तुम्ही मला केंद्र सरकारने बंद केलेल्या ५०० रुपयांच्या नोटा का देत आहात? त्या आम्ही कुठे द्यायच्या, कोणीही घेत नाहीत, असे सांगितले. त्यावर दोघांत वाद झाला. या नोटा सर्वत्र चालतात, तुम्हाला काय झाले न चालवायला? पास काढायचा असेल तर काढा. पण याच नोटा मिळतील, अशी उत्तरे तिकीट कर्मचाऱ्याने दिली. या घटनेमुळे राजू नाराज झाले. त्यांनी बुधवारी रात्री पास घेतला नाही. या अनुभवानंतर त्यांनी गुरुवारी पुन्हा पास काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिकिट वितरण कर्मचारी जरी बदलले होते तरी त्यांनीही जुन्या नोटा देण्याचाच पवित्रा घेतला. यामुळे रेल्वे प्रशासनाचेच हे धोरण आहे की काय, असा सवाल त्यांनी केला. पास काढणे आवश्यक असूनही त्यांना तो घेता आला नाही. त्यांनी तिकीट काढून प्रवास केला.
दोन हजारांच्या नव्या नोटेचेही सुट्टे कोणी देत नाही आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आलेल्या नसल्याने जुन्याच नोटा खपवण्याचा प्रयत्न होतो. रेल्वेत जुन्या नोटा स्वीकारल्या जातील असे सांगूनही तेथेून पुनहा त्याच नोटा जर प्रवाशांच्या माथी मारल्या जात असतील तर प्रवाशांनी त्या कुठे वापरायच्या, असा प्रश्न त्यांनी केला. या संदर्भात नेमकी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्नही त्यांनी ‘लोकमत’कडे केला. (प्रतिनिधी)