बोटीवरील ६ जणांची जीव वाचवण्यासाठी धडपड
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छिमार बोट साेमवारी तौक्ते चक्रीवादळाच्या चक्रात अडकली. बोटीवर एकूण सहा जण असून वादळ आणि खवळलेल्या समुद्रात बोट आणि स्वतःचा जीव वाचविण्याची त्यांची सोमवार रात्रीपर्यंत धडपड सुरू होती.
तौक्ते चक्रीवादळाचा इशारा मच्छिमाराना आधीच दिला गेला होता. रविवारपर्यंत भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील मच्छिमार बोटी किनाऱ्यावर परतल्या. बोटी किनाऱ्यावर याव्यात यासाठी मत्स्य विभाग, महसूल व पोलिसांसह मच्छीमार नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले. डायमंड मिरांडा यांची मच्छिमार बोट किनाऱ्यावर वेळीच परतण्यास निघाली नाही. जेणेकरून ती आता समुद्रात चक्रीवादळाच्या फेऱ्यात अडकली आहे. बोटीवर डायमंड यांचा मुलगा जस्टिन मिरांडा हा नाखवा असून अन्य पाच खलाशी आहेत. हे सर्व खलाशी झारखंडचे आहेत.
रविवारी ही बोट समुद्रातील ओएनजीसीच्या एका वापरात नसलेल्या इंधन विहिरीच्या रिंगवर गेली होती. त्यावेळी त्यांना तेथेच थांबा किंवा डहाणूचा समुद्र किनाराजवळ सुमारे चार तासांवर असल्याने तेथे आश्रयाला जा, असे निर्देश देण्यात आले होते.