Mumbai Train Accident: मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात घडला. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत होत्या. त्यावेळी ही घटना घडली. एक लोकल कसाऱ्याकडे तर दुसरी मुंबईकडे जात होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना कळवा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.
ट्विटमध्ये ते म्हणाले, "दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे."
दरम्यान, CSMT कडून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरी लोकल सीएसएमटीकडे जात असताना कसारा फास्ट लोकल बाजूने जात होती. त्याचवेळी आठ प्रवासी हे लोकल ट्रेनमधून पडले. यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.