एमएमआरडीएच अपघातास जबाबदार?
By Admin | Updated: September 25, 2015 02:20 IST2015-09-25T02:20:19+5:302015-09-25T02:20:19+5:30
वर्षभरापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि त्याची योग्य ती दुरुस्ती न केल्याने झालेल्या अपघातात रिटा प्रसाद

एमएमआरडीएच अपघातास जबाबदार?
अंबरनाथ : वर्षभरापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि त्याची योग्य ती दुरुस्ती न केल्याने झालेल्या अपघातात रिटा प्रसाद या महिलेच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालविणाऱ्या तिच्या मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या निर्णयावर टीका होऊ लागल्याने खड्ड्यांमुळेच हा अपघात घडला का, याची चाचपणी करुन संबंधीतांवरही गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे.
२६ जुलै रोजी अंबरनाथ डंपिंग ग्राऊंडसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. रिटा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर तब्बल सव्वा महिन्याने रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी गाडी चालविणारी त्यांची मुलगी प्रितीवरच गुन्हा दाखल केला. तर पिडीत कुटुंबियांनी या अपघातास एमएमआरडीए आणि ठेकेदारांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी उचलून धरली आहे. अंबरनाथमधील सामाजिक संस्थानीदेखील त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
तीन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कल्याण-कर्जत महामार्ग ताब्यात घेतला आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याचे कामही एमएमआरडीनेच केले. मात्र अनेक ठिकाणी ते काम अर्धवटच ठेवले. ज्या रस्त्यावार अपघात झाला त्याची यापूर्वीही दुरवस्था झाली होती. दोन वर्षांपूर्वी त्याचे काम केल्यानंतरही पहिल्याच पावसात त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. डंपिंग ग्राऊंड समोरील रस्ता काँक्रिटचा केल्यावर उर्वरीत रस्ता पुन्हा डांबरीकरण करुन तो अर्धवटच ठेवला. या रस्त्यावर खड्डे पडणार याची माहिती असतांनाही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी काँक्रिटीकरण पूर्ण केले नाही. त्यातच पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची होती. मात्र ती न झाल्याने खड्डे तसेच राहिले आहेत. त्याचाच फटका प्रसाद कुटुंबियांना बसला. (प्रतिनिधी)