दीपस्तंभ

By Admin | Updated: December 25, 2016 04:29 IST2016-12-25T04:29:42+5:302016-12-25T04:29:42+5:30

एकविसाव्या वर्षांपासून आपल्या अमोघ वक्तृत्वाने राज्यात, देश-विदेशात अनेक उत्तमोत्तम भाषणांसह व्यासपीठ गाजवणारे फर्डे वक्ते, लिहावे कसे... बोलावे कसे..

Lampstand | दीपस्तंभ

दीपस्तंभ

- रामदास खरे

एकविसाव्या वर्षांपासून आपल्या अमोघ वक्तृत्वाने राज्यात, देश-विदेशात अनेक उत्तमोत्तम भाषणांसह व्यासपीठ गाजवणारे फर्डे वक्ते, लिहावे कसे... बोलावे कसे.. याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच माधवराव गडकरी. अफाट ग्रंथसंपदा, अनेक संपादने, हजारो विषयांवरील अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण लेख, यामधून काय वेचायचे आणि कसे वेचायचे, असा प्रश्न पडावा, इतके विपुल लेखन माधव गडकरी यांनी केले आहे.

निर्भीड, झुंजार पत्रकार म्हणून तब्बल तीस वर्षे कारकीर्द गाजवणारे आणि पुढे संपादकीय भूमिकेत शिरल्यानंतर वृत्तपत्रलेखनाद्वारे, स्तंभलेखनाद्वारे अनेक लोकाभिमुख, सामाजिक संस्थांचा, थोर व्यक्तींचा, स्थळांचा, प्रांतांचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि परदेशातील अनेक घटनांचा तपशील वाचकांना करून देताना माधव गडकरी यांची प्रामाणिक तळमळ, धावपळ अधोरेखित होते. त्यांच्याविषयी पु. ल. देशपांडे म्हणतात. ‘आजवर महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक कारागिरांचे हात लागले, त्याच्या हातून घडलेल्या सांस्कृतिक जडावांची आणि ते जडाव घडविणाऱ्या त्या लोकोत्तर कारागिरांची आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची शब्दचित्रे माधवरावांनी काढली. गडकऱ्यांची लेखमाला प्रचंड लोकप्रिय झाली. वाचकांशी सलोखा वाढला. कारण गडकऱ्यांचा मन:पिंड ज्या ज्या संस्कारांनी घडला त्यांच्याशी कृतज्ञ राहून, इमान ठेवून गडकऱ्यांनी अफाट लिहिले, मोकळ्या मनाने लिहिले.’
खरे तर माधवराव हे मूळचे निफाडचे. तेथे वडिलोपार्जित अशी ३०० एकर सुपीक जमीन होती. मात्र नियतीचे असे काही विचित्र फासे पडले, निफाड कायमचे दुरावले आणि
त्यांच्या वडिलांनी शून्यातून विश्व निर्माण करून माधवरावांना वाढवले, शिकविले, मोठे केले.
दि. २५ सप्टेंबर १९२८. माधवराव गडकरींचा जन्म मुंबईतील, लॅमिंग्टनरोडवरील टोपीवाला चाळीतला. १९३२मध्ये माधवराव ठाण्यास राहावयास आले. गोखले रोडवरील मारुती मंदिरासमोरील ‘सिद्धाश्रम’ या इमारतीत दोन वर्ष वास्तव्य. पुढे १९३४ मध्ये वडिलांनी राममारु ती रोडवर एकमजली टुमदार घर बांधले. आजोबांचे ‘सीताराम’ हे नाव या घराला दिले. १९३४ ते १९५८ असे तब्बल चोवीस वर्षे माधवरावांचे निवासस्थान येथे होते. याच कालखंडात माधवरांवाचे शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच माधवराव संपादकीय भूमिकेत शिरलेले होते. निर्झर क्षितिज (१९४७) कडून निर्धार (१९५४) या साप्ताहिकापर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला. माधवरांवाच्या पत्रकारितेची बीजे ‘निर्धार’ या राजकीय साप्ताहिकाने पेरली. म्हणूनच ‘निर्धार ते लोकसत्ता’ माधवरावांचा वृत्तपत्रीय कारकिर्दीमधला प्रवास वाचनीय, अनुकरणीय आणि संस्मरणीय असा आहे. दा. भ. कर्णिक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, पाडगावकर, मधू मंगेश कर्णिक, प्रभाकर अत्रे, नी. गो. पंडितराव अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास माधवरावांना लाभला. त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.
ठाण्याचे नी. गो. पंडितराव यांनी माधवरावांना वक्तृत्वातील खुब्या शिकवल्या. सभेत बोलावे कसे, भाषण कसे असावे याचे जणू धडे दिले. माधवराव त्यांचे ऋण मान्य करतात. माधवरावांचे पहिले जाहीर भाषण गावदेवी मैदानात झाले. ‘ज्यांचे पाठांतर खूप, वाचन भरपूर, अनुभव समृद्ध असतात, ते चांगले वक्ते सहजपणे होतात.’ असे माधवराव नेहमी सांगायचे. अनेक संमेलनात, कार्यक्र मात माधवरावांची अभ्यासपूर्ण भाषणे मी ऐकली आहेत.
पत्रकारितेच्या निमित्ताने माधवरावांनी जवळजवळ सर्वच देशात उदंड भ्रमंती केली. जे काही अनुभवले ते सारे लेखांद्वारे, पुस्तकांद्वारे मांडले. जनमानसामध्ये उदंड आणि सार्थ विश्वास संपादन करून माधवरावांनी एक आदर्श निर्माण केला. समाजातील अनेक वंचितांना आपल्या लेखांच्या माध्यमातून भरघोस अशी मदत केली. एसएससी बोर्डात पहिला आलेला मंगेश म्हसकर याला माधवरावांनी घर मिळवून दिले. तसेच समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर आणि भ्रष्टाचारावर प्रहारात्मक, परखडपणे लिखाण केले. एकीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माधवरावांची भाषणे गाजत असायची, तर दुसरीकडे त्यांची विविधांगी विषयांवरची पुस्तके, लेखसंग्रह सातत्याने प्रकाशित होत असायचे. माधवरावांच्या मध्ये ही ऊर्जा कोठून यायची, याचे मला नेहमी नवल वाटत आले आहे.
माधवरावांच्या एकूण संपादकीय कारिकर्दीचा, लेखनाचा वेळोवेळी गौरव झाला आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यात पद्मश्री, अनन्त हरी गद्रे पुरस्कार, भ्रमन्ती पुरस्कार, लोकश्री पुरस्कार, भारतकार हेगडे देसाई पुरस्कार, प्राचार्य अत्रे पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. २००६ मध्ये ठाणे येथे संपन्न झालेल्या नवव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वरकरणी खूप कठोर आणि कडक स्वभावाचे वाटायचे. मात्र अंतरंगी ते अतिशय मृदू स्वभावाचे होते, कुटुंबवत्सल होते.
ठाणे शहराबद्दल त्यांना विशेष ममत्व होते. माधवराव गडकरी यांचे दि. ८ जुलै १९९८चे एक दुर्मिळ पत्र माझ्या संग्रही आहे.
ते संवाद साधतात. ‘तुम्ही ज्या ठाणे शहरात राहता, त्या गावात मी २४ वर्षे राहिलो. माझ्या वृत्तपत्रीय कारिकर्दीला सुरवात ठाण्यातच झाली. माझी पत्नी पांचपाखाडी या भागातच वाढली. परंतु आजचे ठाणे आमचे नव्हे. शहरे वाढतच जातात परंतु त्याबरोबर जवळीक, आपुलकी, स्नेह संपतो, हे चांगले नाही. तो राहिला पाहिजे.’
एक जून २००६. मुंबई. तब्बल सहा दशके वृत्तपत्रीय क्षेत्रात ‘चौफेर’ मुशाफिरी करणारा, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार असलेला एक लढवय्या, व्यासंगी, व्रतस्थ पत्रकार, एक तत्वचिंतक, मार्गदर्शक, पत्रकारितेच्या अथांग सागरातील दीपस्तंभ कोसळला.

माधवरावांची साहित्यसंपदा
माधवरावांचे एकूण पस्तीसच्यावर ग्रंथ प्रकाशित आहेत. ‘चौफेर’ या त्यांच्या स्तंभलेखनाचे पाच खंड, ‘दृष्टीक्षेप’ या सदरांचे तीन खंड अभ्यासपूर्ण आहेत. व्यक्तिचित्रे प्रवासवर्णने गाजली आहेत. काही निवडक पुस्तके - ‘असा हा महाराष्ट्र’, ‘असा हा गोमंतक’, ‘मुंबई ते मास्को व्हाया लंडन’, ‘सोनार बंगला’, ‘सत्ता आणि लेखणी’, ‘हॅलो चार्लस’, ‘माओ नंतरचा चीन’, ‘कुसुमाग्रज गौरव’, ‘गुलमोहराची पाने’ इ.

Web Title: Lampstand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.