स्वच्छतेचा अभाव; भिवंडीत मलेरियाचे रुग्ण वाढले
By Admin | Updated: August 24, 2015 02:25 IST2015-08-24T02:25:31+5:302015-08-24T02:25:31+5:30
रस्त्यावर साठणारा कचरा व अशुद्ध पाणी यामुळे शहरात विविध ठिकाणी मलेरिया तसेच विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे

स्वच्छतेचा अभाव; भिवंडीत मलेरियाचे रुग्ण वाढले
भिवंडी : रस्त्यावर साठणारा कचरा व अशुद्ध पाणी यामुळे शहरात विविध ठिकाणी मलेरिया तसेच विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रुग्णांबाबत मनपाच्या आरोग्य विभागास माहिती नसून शासनाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांनी गर्दी केली आहे.
महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील कचरा नियमितरित्या उचलला जात नसल्याने तसेच कचरा उचलल्यानंतर तेथे जंतुनाशक औषधांची फवारणी न केल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डबकी साचली आहेत. गटारे साफ न केल्याने सांडपाणी प्रवाहित होत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा झाल्याने तेथे विषमज्वराचे प्रमाण वाढले आहे. याबाबत, मनपाच्या आरोग्य विभागाकडे माहिती नसल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांनी सांगितले. मात्र, स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात लोकमत प्रतिनिधीने डॉक्टरांकडून माहिती घेतली असता त्यांनी मलेरिया व विषमज्वराचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. इंदिरा गांधी रुग्णालयात बाह्यरुग्णांची संख्या दररोज सुमारे ८०० ते १००० असते. तर, मनपाच्या १५ आरोग्य केंद्रांत बाह्यरुग्णांची संख्या ३०० च्या आत असते. ही तफावत गेल्या काही वर्षांपासून कायम असून मनपा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून निष्क्रिय बनले आहेत.
मनपाकडून उपचार मिळाले असते तर आम्ही रिक्षाचा खर्च करून इंदिरा गांधी रुग्णालयात आलो नसतो, असे रुग्णांनी सांगितले. याबाबत, मनपा आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे. (प्रतिनिधी)