खारेगाव टोल नाका आज मध्यरात्रीपासून होणार बंद
By Admin | Updated: May 13, 2017 08:16 IST2017-05-13T08:03:43+5:302017-05-13T08:16:07+5:30
राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका अखेर आजपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.

खारेगाव टोल नाका आज मध्यरात्रीपासून होणार बंद
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 13 - राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका अखेर आजपासून (13 मे) कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद होणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील या रस्त्याच्या उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याचे आयआरबी कंपनीने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा टोल नाका बंद करण्याचे आदेश दिले होते. अखेर वाहनचालकांची टोलच्या कटकटीतून सुटका होणार आहे.
मुंबईहून नाशिककडे जाताना ठाण्यानंतर लागणारा पहिला टोल नाका म्हणजे भिवंडी बायपासवरील खारेगावचा टोल नाका. येथून दिवसाला हजारो वाहने ये-जा करतात. त्यातून आयआरबी कंपनीला दिवसाला लाखो रुपयांचा टोल मिळतो. 1998 साली हा टोल नाका उभारण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चापोटी 180 कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते.
मात्र, प्रत्यक्षात कंपनीने यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वसुली केल्याचा दावा ठाण्यात राहणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी केला आहे. याबाबत, ते अनेक वर्षांपासून टोल नाका बंद करण्यासाठी पाठपुरावा करत होते. टोल नाका बंद होणार म्हटल्यानंतर वाहनचालकांचीही महिन्याला हजारो रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे साहजिकच वाहनचालकांनी या गोष्टीवर आनंद व्यक्त केला आहे.
चालकांना दिलासा
खारेगाव हा राज्यातील पहिलाच टोल नाका आहे. टोलवसुली बंद झाल्यामुळे 13 मे पासून वाहनचालकांना टोल भरण्याची गरज नाही, त्यामुळे प्रवाशांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 1998 साली राज्यातील हा टोल नाका सर्वप्रथम उभारण्यात आला होता.