कचऱ्यामुळे केडीएमसीची घसरगुंडी सुरूच...
By Admin | Updated: February 16, 2016 02:40 IST2016-02-16T02:40:57+5:302016-02-16T02:40:57+5:30
केंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे

कचऱ्यामुळे केडीएमसीची घसरगुंडी सुरूच...
मुरलीधर भवार, कल्याण
केंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे. या सर्वेक्षणामुळे कचऱ्याच्या बाबतीत महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महापालिका कचऱ्यामुळे वारंवार गोत्यात आली असून कचऱ्याच्या अव्यवस्थापनामुळे महापालिकेची घसरगुंडी सुरूच आहे. ती कशी काय सावरणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे.
महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत तळाला गेल्याचे जाहीर होताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवला गेला नाही. त्यात दिरंगाई झाली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी देताना एप्रिल २०१५ मध्ये शहरातील नव्या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यास स्थगिती दिली आहे. ही स्थगिती कायम आहे.
या स्थगितीपश्चात महापालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी निविदा काढली आहे. या महिनाअखेर हे डम्पिंग ग्राउंड बंद केले जाणार आहे.कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी १० टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे. बारावे येथे भरावभूमी विकसित करण्यासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे.
उच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात महापालिकेने धाव घेतली आहे. स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा उपायुक्त पवार यांनी व्यक्त केली आहे.
(प्रतिनिधी)महापालिकेत १९९७ पासून सफाई कामगारांची भरतीच झालेली नाही. सध्या कचरा वाहतूक करण्यासाठी १५० वाहने आहेत. तसेच २ हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून दररोज कचरा उचलला जात आहे. आणखीन साडेपाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
कचरा उचलणाऱ्या ३०० वाहनांची आवश्यकता आहे. चार प्रभागांत कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी गेल्या महिन्यात ठराव मंजूर करण्यात आला आहे.
२७ गावे महापालिकेत आली. त्या ठिकाणचे २०० कर्मचारी महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. शहरातून दररोज ५७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो. २७ गावांतून ७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो.