कथोरे ९ वर्षे झोपले होते?
By Admin | Updated: April 26, 2017 00:20 IST2017-04-26T00:20:24+5:302017-04-26T00:20:24+5:30
अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड येथील फ्युनिक्युलर रेल्वेचे श्रेय घेण्याची हौस आमदार किसन कथोरे यांना असेल तर त्यांनी ती लखलाभ.

कथोरे ९ वर्षे झोपले होते?
डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड येथील फ्युनिक्युलर रेल्वेचे श्रेय घेण्याची हौस आमदार किसन कथोरे यांना असेल तर त्यांनी ती लखलाभ. पण २००८ मध्ये हा प्रकल्प आणल्याचा दावा कथोरे करत असले तरी मागील नऊ वर्षे हा प्रकल्प रखडला होता, त्यावेळी ते झोपले होते का?, आता प्रकल्प पूर्णत्वाला येत असल्याचे पाहून त्यांनी श्रेय घेण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.
‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये मंगळवारी ‘खासदारांचा राजकारणात जन्म तरी झाला होता का?’ या मथळ््याखाली बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यात कथोरे यांनी केलेल्या विधानांवर टीका करताना डॉ. शिंदे ‘लोकमत’शी बोलत होते.
फ्युनिक्युलर रेल्वचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला कोणी त्रास दिला, या विषयी कथोरे यांनी उघडपणे बोलावेच, असे आव्हानही या वेळी डॉ. शिंदे यांनी दिले. २०१४ मध्ये खासदार झाल्यापासून हा रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी पाठपुरावा केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर यासंदर्भात अनेक बैठकाही झाल्या. त्यामुळे या कामाला गती आली आहे. मात्र, कथोरे म्हणतात त्याप्रमाणे २००८ मध्ये त्यांनी हा प्रकल्प आणला, तर मग नऊ वर्षे तो का रखडला, २०१४ पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना कथोरे राष्ट्रवादीत होते, त्यावेळीही ते सत्ताधारी आमदारच होते. मग त्यावेळी त्यांनी काय प्रयत्न केले, याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा, असे डॉ. शिंदे म्हणाले. (प्रतिनिधी)