कल्याणचा फुलबाजार कोमेजला!

By Admin | Updated: September 12, 2016 03:14 IST2016-09-12T03:14:35+5:302016-09-12T03:14:35+5:30

कल्याणचा फुलबाजार सध्या पालिका आणि एपीएमसीच्या वादाच्या गर्तेत सापडला आहे. वापराविना पडून असलेल्या, मोडकळीस आलेल्या शेडमुळे विक्रेत्यांना बसण्यास धड जागा नाही.

Kalyan full market kamajala! | कल्याणचा फुलबाजार कोमेजला!

कल्याणचा फुलबाजार कोमेजला!

कल्याणचा फुलबाजार सध्या पालिका आणि एपीएमसीच्या वादाच्या गर्तेत सापडला आहे. वापराविना पडून असलेल्या, मोडकळीस आलेल्या शेडमुळे विक्रेत्यांना बसण्यास धड जागा नाही. माल साठवण्याची सुविधा नाही. कोल्ड स्टोअरेज नाही. त्यातच करवसुली करूनही साध्या-साध्या सुविधा देण्यात खळखळ सुरू असल्याने या बाजाराला दिवसेंदिवस अवकळा येते आहे. मुंबईनंतरचा मोठा फुलबाजार म्हणून तो विकसित होण्याऐवजी कोमेजू लागला आहे, तो नियोजनाच्या अभावामुळे. मात्र त्याबाबत ना पालिकेला खेद, ना एपीएमसीला खंत.

कल्याणमध्ये पूर्वी फूल व भाजीपाला बाजार हा लक्ष्मीमार्केटमध्ये भरत होता. १९९७ पासून फुलबाजार हा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक एकर जागेवर भरु लागला. बाजार समितीने कल्याण डोंबिवली महापालिकेला फूल बाजारासाठी एक एकर जागा हस्तांतरीत केली. दादरपाठोपाठ सगळ््यात मोठा फूल बाजार अशी कल्याणच्या फुलबाजाराची ख्याती आहे. महापालिका बाजार फी व बाजार समिती उपकर (सेस) वसूल करते. पण तेथे फूल विक्रेते आणि खरेदीदारांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. महापालिकेने फूल मार्केटसाठी उभारलेल्या शेडही मोडकळीस आल्या असून बाजाराची दुरवस्था झाली आहे.
याच ठिकाणी एक मजली व दुमजली इमारत बांधून फूल विक्रेत्यांना सुविधा देण्याचा घाट बाजार समितीने घातला आहे. त्यासाठी ९ कोटी ५० लाख रुपये खर्चाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्याकरिता महापालिकेकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही घेतले आहे. प्रत्यक्षात बाजार समितीच्या ४० एकर आवारात अनेक वास्तू विकसित करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या वापरात नाही. त्याठिकाणी गर्दुल्यांचा वावर असतो. त्यामुळे या वास्तू विकसित करुनही त्याचा उद्देश सफल झालेला नाही. तसेच त्या व्यापारी व विक्रेत्यांनाही मिळालेल्या नाहीत. फूल बाजाराची इमारत विकसित करुन पुन्हा हाच कित्ता गिरवला जाणार असेल, तर त्यातून इमारत विकासाचा उद्देश साध्य होणार नाही. लोकप्रतिनिधींना विकास कामातून केवळ टक्केवारी लाटता येईल आणि विकासाच्या खऱ्या हेतूला हरताळ फासला जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

भाजीबाजारही माघारी : कृषी उत्पन्न बाजार समितीने १९९५ मध्ये महापालिकेस ४० एकर जागेपैकी तीन हजार ८२५ चौरस मीटरचा भूखंड भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरीत करण्यास दिला होता. १९९६ मध्ये महापालिकेने एक एकर जागेवर शेड उभारली. त्याठिकाणी भाजीपाला विक्रेते स्थलांतरीत झाले. मात्र त्यांचा व्यवसाय होत नसल्यामुळे पुन्हा त्यांनी मूळ लक्ष्मी बाजाराकडेच धाव घेतली. फूल विक्रेत्यांना चांगली जागा मिळाल्याने त्यांनी पुन्हा लक्ष्मीबाजारात येणे पसंत केले नाही. १९९७ पासून त्याठिकाणी फूलबाजार भरत आहे. मात्र या फुलबाजाराची दुरवस्था झाली आहे. तेथे सोयी सुविधांची वानवा आहे.

Web Title: Kalyan full market kamajala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.