कल्याण-डोंबिवलीत संयुक्त साहित्य संमेलन?

By Admin | Updated: September 15, 2016 02:25 IST2016-09-15T02:25:50+5:302016-09-15T02:25:50+5:30

खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात कल्याण आणि डोंबिवली या दोनच शहरांत प्रचंड चुरस आहे.

Kalyan-Dombivali Joint Literature Conference? | कल्याण-डोंबिवलीत संयुक्त साहित्य संमेलन?

कल्याण-डोंबिवलीत संयुक्त साहित्य संमेलन?

डोंबिवली/कल्याण : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात कल्याण आणि डोंबिवली या दोनच शहरांत प्रचंड चुरस आहे. एकाच महापालिकेतील या दोन शहरांतील स्पर्धा टाळण्यासाठी आणि हाताशी आलेली संधी डावलली जाऊ नये, यासाठी या दोन्ही शहरांच्या प्रस्तावांचा संयुक्तपणे विचार व्हावा, असे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. संमेलनस्थळाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी डोंबिवली आणि कल्याणच्या दौऱ्यावर येणाऱ्या साहित्य महामंडळाच्या पथकाला दोन्ही शहरे दाखवायची आणि प्रत्यक्षात दोन्ही संस्थांना एकत्र आणून संमेलन पदरी पाडून घ्यायचे, असा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.
कल्याण आणि डोंबिवलीसोबतच बेळगाव आणि विदर्भातील काही गावेही संमेलनाच्या स्पर्धेत आहेत. परंतु, विदर्भातील गावांची आर्थिक क्षमता पुरेशी नसल्याने, स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचा फटका बसण्याची चिन्हे असल्याने त्यांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर, स्पर्धेत असलेल्या बेळगावला तपापूर्वीच साहित्य संमेलनाचा मान मिळाला होता.
त्यामुळे खरी स्पर्धा डोंबिवली आणि कल्याण या शहरांत आहे. संमेलन होईल, हे गृहीत धरून पालिकेने आधीच अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे दोन्हींपैकी कोणत्याही शहराची निवड झाली, तरी पालिका तयार आहे. (प्रतिनिधी)


साहित्य संमेलन कल्याणमध्ये व्हावे, यासाठी आम्ही जोर लावला आहे. कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पालिकेच्या अर्थसंकल्पात संमेलनासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची टीम अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्यासमवेत शुक्रवारी दुपारी दीड वाजता कल्याणमध्ये दाखल होणार आहे. प्रथम शहरातील मान्यवरांसोबत त्यांची बैठक होईल. त्यात मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांच्यासारखे मान्यवर असतील. संमेलनाच्या कल्याणमधील आयोजनासंदर्भात पुस्तिका तयार केली आहे. त्याचे सादरीकरण आणि संमेलनासाठी तयार केलेली चित्रफीत या टीमला दाखवली जाईल. शहरात १०० पेक्षा जास्त हॉटेल्स आहेत. सुभाष मैदान, वासुदेव बळवंत फडके मैदान, यशवंतराव चव्हाण यासारखी मोठी मैदाने आहेत. तसेच आचार्य अत्रे रंगमंदिर आहे. बिल्डर असोसिएशननेही आम्हाला पाठिंबा दिला आहे. तीन हजार कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत. तसेच पाच हजार साहित्यप्रेमींची व्यवस्था करण्याची तयारी आम्ही केली आहे. कल्याण रेल्वेचे जंक्शन असल्याने रेल्वे, बस, खाजगी वाहनांची सोय सहज होऊ शकते. कल्याणला साहित्यिक व सांस्कृतिक वारसा आहे. हे भारताचार्य वैद्यांचे गाव आहे. या सर्व बाजू आमच्यासाठी जमेच्या आहेत, यावर त्यांनी भर दिला.
- राजीव जोशी, अध्यक्ष, कल्याण सार्वजनिक वाचनालय


मागच्या वर्षीही आम्ही साहित्य संमेलनासाठी मागणी केली होती. आगरी युथ फोरम गेल्या १३ वर्षांपासून शहरात भव्य आगरी महोत्सवाचे आयोजन करते. डोंबिवली क्रीडा संकुलात हा महोत्सव होतो. आयोजनाचा दांडगा अनुभव आमच्याकडे आहे. तसेच ग्लोबल कॉलेज आहे. समाजाचा कार्यकर्ता, विद्यार्थी हे सगळे संमेलनात सहभागी होतील. डोंबिवलीला पु.भा. भावे ते शं.ना. नवरे अशी दिग्गज साहित्यिकांची परंपरा आहे. विंदा करंदीकर यांचे वास्तव्य डोंबिवलीत होते. साहित्य व सांस्कृतिक घडामोडींची मोठी परंपरा शहराला लाभली आहे. २५० पेक्षा जास्त सक्रिय संस्थांचे जाळे शहरात आहे. शहरात भव्य क्रीडा संकुल आहे. डोंबिवली जिमखान्यासारखी वास्तू आहे. रोटरी भवन आहे. डीएनसी शाळेचे प्रांगण आहे. भागशाळा मैदान आहे. तसेच प्रीमिअर कंपनीचे ग्राउंड आहे. डोंबिवलीत यापूर्वी अखिल भारतीय नाट्य संमेलन भरले होते. ही शहरासाठी जमेची बाजू आहे. त्या धर्तीवर डोंबिवलीचा विचार व्हावा, अशी आमची मागणी आहे. ती रास्तही आहे. पालिकेने संमेलनासाठी केलेली तरतूद ही दोन्हींपैकी कोणत्याही शहरात संमेलन झाले तरी वापरण्यायोग्य आहे. आमचीही आर्थिक बाजू भक्कम आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाची आठ सदस्यांची टीम अध्यक्षांसह सकाळी१० वाजता सर्वेश सभागृहात दाखल होणार आहे. काही मान्यवरांशी चर्चा केल्यावर टीम पाहणीसाठी क्रीडासंकुलाकडे रवाना होईल. त्यानंतर, त्यांचा अहवाल १८ सप्टेंबरपर्यंत मिळेल.
- गुलाब वझे, अध्यक्ष, डोंबिवलीतील आगरी युथ फोरम

Web Title: Kalyan-Dombivali Joint Literature Conference?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.