भाईंदर परिवहनचा प्रवासही गारेगार
By Admin | Updated: June 24, 2016 03:36 IST2016-06-24T03:36:37+5:302016-06-24T03:36:37+5:30
पालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेत बुधवारी पाच वातानुकूलित बस दाखल झाल्या. या बसच्या तिकिट दराला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अंतिम मान्यता दिल्याची माहिती परिवहनने दिली.

भाईंदर परिवहनचा प्रवासही गारेगार
भार्इंदर : पालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेत बुधवारी पाच वातानुकूलित बस दाखल झाल्या. या बसच्या तिकिट दराला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अंतिम मान्यता दिल्याची माहिती परिवहनने दिली.
पालिकेने २००५ मध्ये सुरु केलेल्या परिवहन सेवेत सुरुवातीला ५० बस कंत्राटी पध्दतीवर चालविण्यास सुरुवात झाली. मात्र ही सेवा तोट्यात जाऊ लागल्याने ती मोडीत काढून २०१० मध्ये खाजगी लोकसहभाग तत्वावरील सेवा सुरु करण्यात आली. मात्र ती असमाधानकारक ठरु लागल्याने पालिकेने २०१५ मध्ये तीसुद्धा मोडीत काढली.
तत्कालिन जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत २५० पैकी ५० बस खरेदी केल्या होत्या. त्यावेळी वातानुकूलित बस खरेदी करण्याचेही प्रस्तावित केले होते. यानंतर पालिकेने पुन्हा कंत्राटी पद्धतीवर सेवा सुरु केली. यावेळी मात्र पूर्वीच्या १०२ बस मोडीत काढून योजनेतील उर्वरित २०० पैकी १०० बस खरेदी केल्या. त्यापैकी सुरुवातीला २८ बस खरेदी केल्या. त्यानंतर १५ बस सेवेत दाखल झाल्या.
विभागात सध्या ३२ स्टॅन्डर्ड, १० मिडी बस १५ मार्गांवर धावत आहेत. यंदा विभागाने १० वातानुकूलित बस खरेदीचा निर्णय घेतला. सुरुवातीला पाच बस खरेदी करण्याचे निश्चित केले. परंतु, या बसच्या तिकिट दर प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून अडीच वर्षापासून मंजुरी न मिळाल्याने त्यांचे आगमन रखडले होते. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने १७ मे रोजी प्रसिद्ध केल्यानंतर ३१ मे रोजी प्रादेशिक परिवहन विभागाची बैठक झाली. त्यात वातानुकूलित बसचा तिकिट दर बेस्टच्या दराइतकाच ठेवण्याला मान्यता दिली. (प्रतिनिधी)