जलमित्रांनी उपसला विहिरीतला गाळ
By Admin | Updated: May 23, 2016 02:17 IST2016-05-23T02:17:00+5:302016-05-23T02:17:00+5:30
डहाणू तालुक्यातील बहुसंख्य भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक जलस्त्रोतांमध्ये मृत साठा शिल्लक असून, या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी वापराविना विहिरीतला गाळ उपसून उपलब्ध पाणी

जलमित्रांनी उपसला विहिरीतला गाळ
अनिरु द्ध पाटील, डहाणू/बोर्डी
डहाणू तालुक्यातील बहुसंख्य भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक जलस्त्रोतांमध्ये मृत साठा शिल्लक असून, या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी वापराविना विहिरीतला गाळ उपसून उपलब्ध पाणी जंतुनाशके टाकून ते पिण्यायोग्य करणे शक्य आहे. डहाणूतील आगर आणि बोर्डीतून अशा विहिरींचा गाळ उपसण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या अभिनव योजनेचा स्वीकार केल्यास पाणीटंचाईला तोंड देता येईल, असा विश्वास उपक्रमात सहभागी जलमित्रांनी व्यक्त केला आहे.
जलसाठ्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही. बोर्डी ते चिंचणी या किनाऱ्यालगतच्या गावांचा विचार केल्यास, या गावांमध्ये खाजगी आणि सरकारी विहिरींचे प्रमाण अधिक आहे. गेल्या काही वर्षात अनेक गावात शासकीय कूपनलिका आणि नळपाणी पुरवठ्याच्या योजना कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांकडून विहिरी दुर्लक्षिल्या गेल्या असून, बहुसंख्य विहिरी वापरावीना आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाल्याने जलसाठयांची पातळी खालावल्याने मागील काही वर्षांपेक्षा पाणीटंचाई प्रकर्षाने जाणवते आहे. त्यामुळे अशा विहिरींचे महत्व अधोरेखित झाले आहे. आजही या विहरींमध्ये जलसाठा आहे. मात्र पाण्याचा वापर होत नसल्याने पाणी दुर्गंधीयुक्त बनले आहे. या विहिरींचा गाळ उपसून जंतुनाशकाच्या सहाय्याने ते शुद्ध केले तर पिण्यालायक पाणी सहज उपलब्ध होवू शकते. महत्वाची बाब म्हणजे समुद्राला भरती आल्यास विहिरीची पाणी पातळी वाढते असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान या विहिरींचे महत्व ओळखून आगर येथील उन्नती मंडळाच्या मनेश राऊत, प्रीतेश राऊत, रितेश पाटील, नैलेश कडू, अमय कडू, सौरभ कडू, सागर कडू, विजय कडू या सदस्यांनी एकत्र येऊन उपजिल्हा रुग्णालयासमोरील दोन विहिरींतून कचरा व गाळ उपसला. बोर्डी ग्रामपंचायतीनेही गावदेवी येथील विहिरीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन, विहिरीच्या काठावर जाळी बसवल्याचे उपसरपंच सुचित सावे यांनी संगितले. त्यामुळे ग्रामस्थांना विहिरीचे पाणी चोवीस तास उपलब्ध होणार आहे. भारनियमन काळात पंप बंद असले तरी हाताने उपसून पाणी काढता येईल.