‘बारवी’त वाढीव पाणीसाठा?
By Admin | Updated: July 11, 2016 02:00 IST2016-07-11T02:00:14+5:302016-07-11T02:00:14+5:30
मुरबाड-अंबरनाथ तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून जिल्हाभर पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवण्याचे काम झालेले असले

‘बारवी’त वाढीव पाणीसाठा?
पंकज पाटील, अंबरनाथ
मुरबाड-अंबरनाथ तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून जिल्हाभर पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवण्याचे काम झालेले असले तरी अद्याप या धरणात अतिरिक्त पाणीसाठा साठवलेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण करून तेथे वाढीव पाणीसाठा साठवण्याची तयारी एमआयडीसीने सुरू केली आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांचे कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण १९७२ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर, १९८६ आणि पुन्हा १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढवली. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण्याची क्षमता होती. आता नव्याने धरणाची उंची ९ मीटर वाढवल्याने हीच क्षमता दुप्पट झाली असून आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
धरणाच्या उंचीवाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलित दरवाजांचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, धरणाची उंची वाढल्याने बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसनासोबत धरणग्रस्तांना रोजगाराची संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी एमआयडीसी एकटी पूर्ण करू शकत नसल्याने आता या धरणातून ज्या महापालिका आणि नगरपालिकांना पाण्याची गरज भासणार आहे, अशा महापालिका आणि नगरपालिकांनी येथील धरणग्रस्तांना नोकरी देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यासोबत, त्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत, त्या मान्य करून ती गावे स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण करून येथे वाढीव पाणी साठवण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिकारी उघडपणे बोलत नसले तरी यंदाच्या पावसाळ्यात वाढीव पाणीसाठा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.
जिल्ह्याला वाढीव पाणीसाठा देण्यासाठी अद्याप एकाही धरणाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे वाढीव पाण्यासाठी जिल्ह्याला उल्हास नदी आणि बारवी धरणावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. बारवीच्या वाढलेल्या उंचीतून जो धरणात अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होईल, त्यावरच जिल्ह्याची तहान भागेल.