भिवंडीतही बेकायदा हुक्का पार्लरचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:23 IST2021-01-04T00:23:03+5:302021-01-04T00:23:08+5:30
या पार्लरमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या हुक्का पार्लरमध्ये जाऊन नशेचे शिकार होत आहेत. या नशेखोरीमुळे शहरात चोरी व गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.

भिवंडीतही बेकायदा हुक्का पार्लरचा सुळसुळाट
नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात विविध ढाबे, हॉटेल, कॉफी हाऊस, यामध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस प्रशासनाकडे येत असतात. मात्र, त्या-त्या विभागाच्या स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने व राजकीय वरदहस्तांमुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत.
या पार्लरमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या हुक्का पार्लरमध्ये जाऊन नशेचे शिकार होत आहेत. या नशेखोरीमुळे शहरात चोरी व गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.
भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ २ अंर्तगत येणारे पोलीस स्टेशन कोनगांव, नारपोली, निजामपुरा, शांतीनगर, शहर पोलीस ठाणे व भोईवाडा पोलीस स्टेशन, तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या अंर्तगत ठिकठिकाणी बेकायदा हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ग्रामीण भागात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गांवर असलेले ढाबे व हॉटेलमध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरू केल्याची उदाहरणे समोर आहेत.
विशेष म्हणजे नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे या अवैध हुक्का
पार्लरवर स्थानिक पोलिसांकडून थातुरमातुर कारवाई करण्यात येते. मात्र, या हुक्का पार्लरवर कायमस्वरूपी बंदी घातल्याचे सहसा पाहायला मिळत नाही, उलट हुक्का पार्लरचे चालक मालक नाव आणि ठिकाण बदलून पुन्हा पार्लर सुरू करताना नेहमीच पाहायला मिळते.
सरसकट कारवाईची मागणी
मागील आठवड्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने खाडीपार परिसरात जॉय हुक्का पार्लरवर रात्रीच्या सुमारास छापा टाकून जवळपास २५ तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी २५ तरुण हुक्क्याच्या नशेमध्ये धुंद असल्याचे दिसून आले. या प्रकरणी निजमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर फैजदारी कारवाई करण्यात आली आहे. हुक्का पार्लरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तरुणतरुणी जात असल्याने, पालकांमध्ये चिंता पसरली आहे. मात्र, या हुक्का पार्लरवर सरसकट कारवाई होत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.