किती वर्षे असे मरत मरत जगायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:10 AM2020-02-19T01:10:08+5:302020-02-19T01:10:17+5:30

एमआयडीसीतील रहिवाशांनी केला सवाल : सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळेच आमच्यावर आली ही वेळ

For how many years did you die? | किती वर्षे असे मरत मरत जगायचे?

किती वर्षे असे मरत मरत जगायचे?

Next

डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील रासायनिक कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटांची आता सवयच झाली आहे. काहीही झाले की या परिसरातील रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे फर्मान सुटतात. घराला कुलूप लावून सुरक्षा यंत्रणा आम्हाला आमच्याच घरातून हुसकावतात. प्रोबेस दुर्घटनेपासून असेच सुरू आहे. असे आणखी किती वर्षे असे मरत मरत जगायचे? ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कधी ठोस उपाययोजना होणार की नाही? असा उद्विग्न सवाल करून राज्य सरकारच्या उदासीनतेमुळेच आमच्यावर ही टांगती तलवार कायम आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

दुपारी १२ च्या सुमारास कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि एकच घबराट पसरली. तोच पोलिसांच्या गाड्या येऊ न थडकल्या. त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने दीड किलोमीटरचा परिसर तातडीने रिकामा करण्याचे आदेश दिले. दुपारचे जेवणही झाले नव्हते, तोच हा आदेश आला. काही तरी भयानक घडल्याचे तेव्हाच लक्षात आले आणि भीतीने कापरेच भरले. काय करावे हेच सूचत नव्हते. सर्व कामे जागच्या जागी सोडून आम्ही बाहेरची वाट धरली. मरण उशाशी घेऊ नच आम्ही येथे राहत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
सातत्याने निवदने, पत्रे, चर्चा आणि भेटीगाठी सर्व काही करून झाले; राज्य सरकार, एमआयडीसी आणि अन्य सरकारी यंत्रणांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. आम्ही जगलोे काय, मेलो काय यांची त्यांना तमाच उरलेली नाही. सुसंस्कृत शहर म्हणून आयुष्याची पुंजी गोळा करून येथे घर घेतले ही आमची चूक आहे का? असा सवाल रहिवासी करत आहेत. आम्हाला घराबाहेर पडा असे सांगतले जाते. मात्र, कुठे आणि किती वेळ जायचे, हे कोणीच सांगत नाही. घराला काही तडे गेले, नुकसान झाले तर ते कोण भरून देणार याचाही पत्ता नाही. आणखी किती वर्षे असे सुरू राहणार? राग आला तरी व्यक्त कुठे व्हायचे? सर्वच ठिकाणी कुचंबणा सहन करावी लागत आहे, अशी हतबलता येथील रहिवासी निलेश काळे यांनी व्यक्त केली. शत्रुघ्न सोनवणे, चंद्रकांत बोबडे, शीला प्रभू, दिनेश नायक, सूर्यकांत गाणार, श्रेया महाडिक, लीना चौधरी, विनोद बेंद्रे, संतोष कुमारसिंग यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या गोंधळामध्ये गर्भवती, लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले.

सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी बोलावले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तसेच आगही आता आटोक्यात आली आहे. सर्व यंत्रणा कार्यरत आहे.
- डॉ. राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

इमारती, चाळी केल्या रिकाम्या
म्हात्रे पाडा, स्नेहगंध छाया, सह्याद्री, शर्वरी, संध्या, सियारा, आरएच १- २, ९,१०,११, परिक्षित इमारत, नयनरूप इमारत, नवप्राजक्त, सुधांशू दर्शन, नागार्जुन, श्रुती लीला, स्वस्तिक आणि आइस फॅक्ट्री रस्ता, सोनारपाडा येथील बहुतांशी इमारती चाळींमधील हजारो रहिवासींना घराबाहेर निघण्याचे आदेश देण्यात आले.

उग्रवासामुळे
श्वसनाचा त्रास
शहरभर काळा धूर आणि जळण्याचा वास पसरला होता. त्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. रात्री सर्वत्र खूप उग्र दर्प येत होता. रात्री उशिरापर्यंत आग धुमसतच होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, अधिकारी, जवान सगळे सात तास झाल्यानंतरही घटनास्थळी होते.

आग लागलेली कंपनी ही पाच धोकादायक कंपन्यांपैकी एक होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच कंपन्यांनी त्यांची सुरक्षा जपून कामगारांच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होेते. त्या आदेशांकडे कानाडोळा करणाºया बेजबाबदार एमआयडीसी अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे.
- राजेश मोरे, शिवसेना शहरप्रमुख, डोंबिवली

दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी एमआयडीसीतील कंपन्यांनी आता तरी सुरक्षेचे काटेकोर नियम पाळावेत. जेणेकरून कामगारांसह परिसरातील रहिवाशांच्या जीवाचा धोका टळेल. नियमांचे पालन करणाºया कंपन्यांवर एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वचक नसेल तर मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल.
- शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हाध्यक्ष, भाजप

कोणत्याही कंपनीने मार्जिनल स्पेस सोडलेला नसल्यामुळे दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी येतात. तसेच फायर आॅडिटही होत नसल्याने आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालनच कंपन्या करत नसल्याचे वारंवार उघड होत आहे. सरकार बदलले की दौरे होतात, नोटिसा जातात आणि हप्ते वाढवले जातात. यापुढे काहीच होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौºयानंतर पंधरा दिवसांतच ही दुर्घटना घडल्याने हा विषय अधिकारी आणि कंपनीचालकांनी किती गांभीर्याने घेतला हे स्पष्ट होते. या घातक कंपन्यांना हाकला. रोजगारापेक्षाही जीव महत्त्वाचा आहे.
- राजेश कदम, उपाध्यक्ष, मनसे

डाय बनवणारी ही रासायनिक कंपनी आहे. जपानशी तिचे टायअप आहे. या कंपनीच्या स्टोअर रूममध्ये ही आग लागली. आगीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याचे कळताच कंपनीतील दोन लाख लीटर पाणी तातडीने तेथे वापरण्यात आले. फोमही मारण्यात आला आणि आग प्रतिबंधक सिलिंडरचा फवाराही मारण्यात आला. तरीही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. त्यानंतर अग्निशमन दल तासाभराने आले. या कंपनीचे फायर आॅडिट झालेले होते. तसेच जपानमधील कंपनी ते करून घेते. गेल्यामहिन्यात तेथे मॉकड्रीलही करण्यात आले होते. तरीहीही घटना घडली हे दुर्दैवी आहे.
- देवेन सोनी, अध्यक्ष, कामा संघटना

मेट्रोपॉलिटियन आणि प्रोबेस घटनेवरून डोंबिवलीचा भोपाळ होऊ नये ही काळजी रासायनिक कंपन्यांनी घ्यायला हवी होती. ती घेतलेली नाही, त्यामुळे संबंधित कंपन्यांना राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन येथून स्थलांतरित करावे. कामगारांचाही जीव महत्त्वाचा असल्याने कंपन्या बंद करून उपयोग नाही, पण स्थलांतर महत्त्वाचे आहे.
- सुधीर वंडार पाटील,
कल्याण जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
 

Web Title: For how many years did you die?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे