दरवर्षीच्या शेकडो अपघातांमुळे ‘हायवे’ बनलाय ‘डायवे’
By Admin | Updated: August 12, 2014 23:20 IST2014-08-12T22:02:15+5:302014-08-12T23:20:58+5:30
खड्डे आणि काही ठिकाणी अरूंद असलेले रस्ते यामुळे वाहतूक कोंडी आणि वाहनांचे अपघात

दरवर्षीच्या शेकडो अपघातांमुळे ‘हायवे’ बनलाय ‘डायवे’
सुभाष कदम - चिपळूण-- मुंबई - गोवा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळाच. या महामार्गावर दरवर्षी शेकडो अपघात होत असतात. सन २००० ते एप्रिल २०१४ अखेर महामार्गावर झालेल्या २३४ अपघातात १३७ जणांचा बळी गेला आहे. २०१३मध्ये एकाचवेळी ३७ जणांचा बळी गेला. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा अपघात ठरला आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या मागणीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झाली आहे.
मुंबई - गोवा महामार्ग पळस्पे रायगडपासून सुरु होतो. परंतु, या महामार्गावर कशेडी घाट हा सर्वांत महत्त्वाचा पॉर्इंट आहे. पोलादपूर ते मोरवंडे (ता. खेड) दरम्यानच्या भागात अपघातांची संख्या मोठी असते. हे क्षेत्र अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यात अनेक जायबंदी होतात. त्यांना आपले हात, पाय व अन्य अवयव गमवावे लागले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल २०१४ अखेर गेल्या १४ वर्षांत महामार्गावर १५३४ अपघात झाले. वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या व अप्रशिक्षित चालकांमुळे महामार्गावर अपघात वाढत आहेत. रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे, दारु पिऊन वाहन चालवल्यामुळे, वेगावर नियंत्रण नसल्यामुळे म्हणजेच हलगर्जीपणामुळे अनेक अपघात झाले आहेत, यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. खेड येथे मार्च २०१३ मध्ये महाकाली ट्रॅव्हल्सच्या चालकाने मद्यपान करुन जगबुडी नदी पुलावर अपघात केला. यामध्ये ३७ जणांचा बळी गेला. ही घटना ताजी आहे. मात्र, यातून एकही चालक बोध घेत नाही. घरी आपली कोणी तरी वाट पाहात आहे, याची जाणीव त्यांना नसते.
या महामार्गाचा पळस्पे ते पात्रादेवी असा विस्तार आहे. त्यातील पळस्पे ते इंदापूर हा ८४ किमीचा रस्ता व झाराप ते पात्रादेवी २१.५० किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. कशेडी ते पत्रादेवी या २१३ किलोमीटरच्या अंतरात ११ मोठे पूल व ४१ लहान पूल आहेत. अनेक ठिकाणी हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होतात. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांसह माजी खासदार नीलेश राणे व विविध संघटनांनी पाठपुरावा केल्याने आता पुढील कामाला गती मिळाली आहे. इंदापूर ते कशेडी, कशेडी पायथा ते ओझरखोल, ओझरखोल ते राजापूर, राजापूर ते झाराप असे चौपदरीकरणाचे टप्पे आहेत. या महामार्गाच्या भूसंपादनाचे काम, महामार्गात येणाऱ्या दूरध्वनी व विद्युत वाहिन्या हटविण्याचे कामही सुरु झाले आहे. त्यामुळे लवकरच महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील मोठे पूल
नदी वर्ष लांबी (मीटर) रुंदी (मीटर)
जगबुडी १९३१११८ ६.१०
वाशिष्ठी१९४३ ७३ ६
वाशिष्ठी १९४३ ७३ ६
आरवली १९३२ ७३ १२
शास्त्रीपूल१९३९ ८३.५ ६.४०
सोनवी १९७९ ६२ ५.७०
सप्तलिंगी १९२५ ६५७.५०
बावनदी १९३१ ९८ ६.६०
अंजणारी १९३३ ६३ ९
वाकेड १९४० ६३ ८
राजापूर १९४७ १०० ५.४०
-पळस्पे ते पत्रादेवीपर्यंतचा महामार्ग अवघड वळणावळणाचा.
-महामार्गावर आहेत अवघड घाट रस्ते.
-११ मोठे पूल. तर ४१ लहान पुलांचा समावेश
-५२ पुलांपैकी ५ पूल अरुंद.
-दरवर्षी जातात शेकडो बळी, तर हजारो होतात -
चौपदरीकरणाच्या कामाला केंद्राचा हिरवा कंदील.
1मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे आणि काही ठिकाणी अरूंद असलेले रस्ते यामुळे वाहतूक कोंडी आणि वाहनांचे अपघात अशा घटना घडत आहेत.
2खेडमध्ये २०१३मध्ये जगबुडी नदीवर झालेल्या अपघातात ३७जणांचा झालेला मृत्यू हा महामार्गावरचा सर्वात मोठा अपघात ठरला आहे. अरूंद पुल आणि त्यावरून हाराकिरीने चालवली जाणारी वाहने, हा नित्याचाच विषय ठरला आहे.