जोरदार पाऊसधारांचा जिल्ह्यात दिवसभर धिंगाणा

By Admin | Updated: June 26, 2016 01:31 IST2016-06-26T01:31:27+5:302016-06-26T01:31:27+5:30

ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून ठाणे जिल्ह्यात शुक्र वारी दुपारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने दमदार हजेरी लावत वाहतुकीसह सरकारी यंत्रणांची दाणादाण उडवली. नालेसफाईचे दावे तर

Heavy rain breaches in the district all day long | जोरदार पाऊसधारांचा जिल्ह्यात दिवसभर धिंगाणा

जोरदार पाऊसधारांचा जिल्ह्यात दिवसभर धिंगाणा

ठाणे : ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून ठाणे जिल्ह्यात शुक्र वारी दुपारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने दमदार हजेरी लावत वाहतुकीसह सरकारी यंत्रणांची दाणादाण उडवली. नालेसफाईचे दावे तर फोल ठरलेच, पण पावसाचे पाणी वाहून जाणारी गटारे साफ न केल्याने ठिकठिकाणी पाणी तुंबले. जोरदार वाऱ्यासह पावसाच्या धिंगाण्याचा पहिला फटका नेहमीप्रमाणे रेल्वे वाहतुकीला बसला. रस्ते वाहतूकही मंद गतीने सुरू होती. डोंबिवली पश्चिमेत १६ तास वीजपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले.
ठाण्यात हायलॅण्डनजीक महालक्ष्मीनगरात भूस्खलन झाल्याने ६० ते ७० घरांना धोका निर्माण झाला आहे.
ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात सरासरी ४६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाला सोमवारी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असली, तरी त्याने जोर पकडला नव्हता. शुक्रवारपासून मात्र पावसाची संततधार कायम होती आणि नंतर त्याने जोर पकडला. पहाटेपासूनच जोरदार वृष्टी सुरू असली, तरी सकाळी काही काळ त्याने विश्रांती घेतली. नंतर, मात्र पुन्हा जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली आणि दिवसभर तो बरसत राहिला.
ठाण्यात बाळकुमच्या महालक्ष्मीनगरमध्ये जमीन खचल्यामुळे सुमारे ७० घरांना धोका निर्माण झाला आहे. तर, यशस्वीनगरात नाल्याची भिंत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरले. पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यांमध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामाला जोर चढला आहे.

दिवसभरात ५१ तक्रारी
या पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.
शनिवारी दिवसभरात ठाणे महापालिका आपत्कालीन कक्षाकडे सुमारे ५२ तक्र ारींची नोंद झाली.
त्यात आग लागण्याच्या
चार, शॉर्टसर्किटची एक, झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या २१, पाणी तुंबण्याच्या ९, भिंत कोसळण्याच्या २, गॅसगळतीची एक तक्रार, तसेच एक बोगस कॉलही आला.

टिटवाळ्यात रस्ते जलमय
टिटवाळा : पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पहिल्याच पावसाने गटारे तुंबल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत होते. दळवीवाडा, निमकरनाका, देशपांडेवाडा, आनंद दिघे मार्ग आणि इतर ठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावरून वाहू लागले.

अंबरनाथमध्ये जनजीवन विस्कळीत : मुसळधार पावसामुळे अंबरनाथचे जनजीवन विस्कळीत झाले. कल्याण-बदलापूर महामार्ग पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला. रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्यांची सफाई न केल्याने ते कचऱ्याने तुंबले होते. त्यामुळे नाल्यातील पाणी महामार्गावर आले. अशीच परिस्थिती शहरात अनेक ठिकाणी होती. नाल्याचे पाणी वस्तीत आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जोरदार पावसामुळे नाल्याशेजारी काढून ठेवलेला गाळ पुन्हा नाल्यातच वाहून गेला. त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार जास्त घडले. बिग सिनेमासमोर आणि गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन्ही नाले तुंबले.

उल्हासनगरात साचले पाणी
उल्हासनगर : संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. कॅम्प नं-४ येथील साईनाथ कॉलनी, नागराणी मंदिर, राधास्वामी सत्संग मुख्य रस्ता, गुलशननगर, कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर पाणी साचले. नाल्याचे अर्धवट काम व पडलेल्या मातीमुळे पाणी तुंबल्याचा अंदाज आहे.

Web Title: Heavy rain breaches in the district all day long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.