'हरवलेले मूल मुंबईत मिळाल्याचा आनंदच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:18 IST2019-09-21T23:18:30+5:302019-09-21T23:18:54+5:30

घरफोडी, चोरी, दरोडे किंवा खून, फसवणूक यासारखे किंवा त्यापेक्षा किचकट गुन्हे आतापर्यंत उघडकीस आणणाऱ्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने नुकतेच देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि राजस्थान येथील एक नव्हे तर तीन अल्पवयीन मुलांचा ठाणे, नवी मुंबई व मुंबईसारख्या शहरांमध्ये शोध घेऊन त्यांना सुखरूपरीत्या स्वगृही धाडण्यात यश मिळवले.

'Happy to have a lost child in Mumbai' | 'हरवलेले मूल मुंबईत मिळाल्याचा आनंदच'

'हरवलेले मूल मुंबईत मिळाल्याचा आनंदच'

- पंकज रोडेकर 

घरफोडी, चोरी, दरोडे किंवा खून, फसवणूक यासारखे किंवा त्यापेक्षा किचकट गुन्हे आतापर्यंत उघडकीस आणणाऱ्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने नुकतेच देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि राजस्थान येथील एक नव्हे तर तीन अल्पवयीन मुलांचा ठाणे, नवी मुंबई व मुंबईसारख्या शहरांमध्ये शोध घेऊन त्यांना सुखरूपरीत्या स्वगृही धाडण्यात यश मिळवले. यासंदर्भात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद...

अपहरणाचे गुन्हे ठाण्यात किंवा मुंबईत दाखल नसताना ते कसे उघडकीस आणले?
ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्वच पोलीस दलातील शाखांना अपहरण यासारखे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यातूनच मिळालेल्या माहितीच्या आधारे, दिल्लीतील मुलीचा विश्वास संपादन केला. त्यातून तिने सुरुवातीला वेगवेगळी खरी वाटेल अशी माहिती देताना, आईवडील नसल्याचे सांगितले. मात्र, शोध घेतल्यावर आईवडील असल्याचे समोर आले. तर, राजस्थान येथील मुलांबाबत स्थानिक पोलिसांना ही मुले ठाणे किंवा नवी मुंबई यासारख्या परिसरांत आहेत, असे समजले होते. त्यानुसार, त्यांचा शोध घेऊन हे गुन्हे उघडकीस आणले.

चोरी, हत्या किंवा दरोडा यापेक्षा अपहरण गुन्ह्याचा तपास किती वेगळ्या प्रकारे करावा लागतोे?
चोरी, हत्या किंवा दरोडा यासारख्या गुन्ह्यात नेमकी काहीतरी कारणे असतात. मात्र, या गुन्ह्यात तशी काही कारणे नसतात. त्यातच, सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील हरवलेल्या मुलांची मिसिंग अशी नोंद न करता अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यातच, हा गुन्हा इतर गुन्ह्यांपेक्षा निश्चित वेगळा आहे. यामध्ये त्या मुलांचा प्रथम विश्वास संपादन करून त्यांना बोलते करावे लागते. त्यातून त्यांच्याकडून थोडी तरी माहिती मिळाली की, तो गुन्हा उघडकीस येतो.

मुले का घर सोडून पळतात?
घरची मंडळी लहान वयात लग्न लावून देतील. तसेच आपल्यापेक्षा लहान भावंडांवर आईवडील जास्त प्रेम करतात. तर, एखाद्या परीक्षेत नापास झाल्याने मारण्याच्या भीतीने, घरातील पालकांची भांडणे, वडिलांचे व्यसन त्याचबरोबर प्रेमप्रकरण आदी कारणांतून मुले घर सोडतात.

तुम्ही मुलांसह पालकांना काय सांगाल?
मुलांपेक्षा पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. पालकांच्या दिवसेंदिवस मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच, कडक वागणूक यामुळे सुरक्षित वातावरण शोधण्यासाठी मुले घरातून पळ काढतात. त्यामुळे पालकांनी पाल्यांमधील बदलाकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून आपल्या पाल्याची माहिती घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमताही लक्षात घेऊन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा करू नये. त्यातच, पालकांनी आपल्या चुका पहिल्या सुधारल्या पाहिजेत.

Web Title: 'Happy to have a lost child in Mumbai'