सर्वेक्षणात गौडबंगाल?
By Admin | Updated: June 25, 2016 01:34 IST2016-06-25T01:34:56+5:302016-06-25T01:34:56+5:30
बडोदा ते जेएनपीटीपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

सर्वेक्षणात गौडबंगाल?
बदलापूर : बडोदा ते जेएनपीटीपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी जागेचे सर्वेक्षणही केले जात आहे. मात्र अंबरनाथ तालुक्यातील ज्या भागातून हा रस्ता अधिक प्रमाणात जाणार आहे, त्या भागातील तीन गावांमधील कोणत्या शेतातून हा रस्ता जाणार आहे हे निश्चित केलेली नाही. नव्या सर्वेक्षणात या तीन गावातील सातबारा दाखविण्यात येत नसल्याने हा रस्ता बिल्डरांसाठी फिरविला जातोय की काय अशी शंका उपस्थित होत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे तक्रारीही केल्या आहेत.
बदलापूरमधून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले होते. मात्र शेतकऱ्यांनी विश्वासघात होत असल्याचा आरोप करत सर्वेक्षणाला विरोध केला. तसेच हा रस्ता जाहीर करताना बाजारभावाने मोबदला द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यातच आता बदलापूरमधील सापे, जुवेली आणि दहीवली या तीन गावातून जाणाऱ्या चार किलोमीटर रस्त्याच्या जमीन संपादनाच्या नोटीसा आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रामाचे वातवरण असल्याचे बाळाराम जाधव यांनी सांगितले. नॅशनल हायवे अॅथोरिटीने या रस्त्यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर इतर अधिकारात नाव टाकून जमिनी संपादीत करण्याची प्रक्र ीया सुरू केली आहे. मात्र सापे, जुवेली आणि दहीवली या तीन गावाच्या २०११ मध्ये जाहीर केलेल्या यादीतील महसूली गावांना नोटीसा आलेल्या नाहीत. त्यातच ज्या भागातील शेतकऱ्यांना नोटीस आली नाही त्याच भागात एका बड्या बांधकाम व्यवसायिकाने निवासी संकुलाचे कामही सुरु केले आहे. याच जागेतून हा रस्ता जात असतानाही बिल्डर कोणतीही तमा न बाळगता हे काम करत असल्याने या भागातून जाणारा रस्ता वळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
ज्या जागा संपादीत करायच्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत. मात्र ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे त्याच भागापासून पुढे शेतकऱ्यांना नोटीस न आल्याने रस्त्याच्या कामात फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या तीन गावातील रस्त्याच्या भूसंपादनासाठी नेमकी कोणती जागा जाणार हे जाहीर न करण्यामागे कारण काय असा प्रश्न येथील शेतकरी विचारत आहेत.
एवढ्या मोठ्या रस्त्याच्या कामासाठी सर्वेक्षण होत असताना सर्व शेतकऱ्यांना कोणती जागा जाणार आहे याची माहिती दिलेली आहे. मात्र अवघ्या चार किलोमीटरच्या या तीन गावातील शेतकऱ्यांना कोणती जागा जाणार हे अद्यापही माहित नाही. २०११ मध्ये जागा निश्चित झालेली आहे. मात्र आता नव्याने सर्वेक्षण करताना ही गावे का वगळली याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. बड्या बिल्डरांनी जागा विकत घेतल्याने त्यांच्या जागेतून रस्ता जाऊ नये यासाठी ही सर्व सोय अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. जोपर्यंत रस्त्याचा मार्ग निश्चित होत नाही तोपर्यंत सर्वेक्षण करु नका असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. ज्या ठिकाणाहून रस्ता जात आहे तो वळविण्याचा प्रयत्न झाल्यास चामटोली ग्रामस्थांना उद्धस्त करणारा ठरणार आहे. (प्रतिनिधी)
मुंबई-बडोदा महामार्गाचे सर्वेक्षण रोखलेबदलापूर : मुंबई - बडोदा महामार्गाला बदलापूरमधील शेतकऱ्यांनी आता तीव्र विरोध करण्यास सुरूवात केली आहे. मोजणीसाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र्र विरोधामुळे सर्वेक्षण न करता परतावे लागले. शेतकऱ्यांना योग्य मोबदला जाहीर होत नाही तोपर्यंत सर्वेक्षणही करू देणार नाही अशी भूमिका संघर्ष समितीने घेतल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी यांनी सांगितले.
या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र ऐनवेळी बैठक रद्द झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी गंभीर नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे शुक्रवारी अंबरनाथ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वेक्षणाचे काम थांबविले. जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तो पर्र्यंत कोणत्याही प्रकारे काम होऊ देणार नाही असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतला आह.े या आंदोलनात बदलापूर आणि परिसरातील २०० शेतकरी सहभागी झाले होते. तसेच शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे, माजी नगरसेवक मंगेश धुळे, युवा सेनेचे उपशहर प्रमुख सुधीर भोसले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ व महिलाही सहभागी झाल्या होत्या.
(प्रतिनिधी)