बसगाड्यांना लागणाऱ्या आगीला प्रशासनच जबाबदार

By Admin | Updated: August 11, 2016 03:58 IST2016-08-11T03:58:08+5:302016-08-11T03:58:08+5:30

केडीएमटीच्या बसना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांना प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी केला

The fire administration is responsible for the buses | बसगाड्यांना लागणाऱ्या आगीला प्रशासनच जबाबदार

बसगाड्यांना लागणाऱ्या आगीला प्रशासनच जबाबदार

कल्याण : केडीएमटीच्या बसना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांना प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी केला आहे तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अहवाल सादर करा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
गणेशघाट आगारातून बाहेर पडलेल्या बसला २९ जुलैला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याण बस आगारात केडीएमटीच्या आणखीन एका बसला आग लागल्याची घटना घडली. चालक आणि वाहकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने आगीचे प्रमाण फारसे वाढले नाही. इंजीनच्या वायरमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनांना कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी परिवहन सदस्यांच्या वतीने परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे आणि आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली. आग लागलेल्या दोन्ही बस आयशर कंपनीच्या आहेत. वारंवार घडलेल्या घटना पाहता कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या सर्व घटनांना तत्कालीन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सभापती चौधरी यांनी केला आहे. या कंपनीच्या २० बसेस उपक्रमाकडे आहेत. बस खरेदीआधी २ सप्टेंबर २०१३ रोजी इंदौर येथे या बसेस पाहणी करण्यासाठी परिवहनचे सदस्य गेले होते. त्या बाहेरून योग्य वाटत असल्या तरी उपक्रमात दाखल होण्याआधी त्याचे स्ट्रक्चर बॉडी इनस्पेक्शन सदस्यांच्या समक्ष होणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात तत्कालीन महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांना पत्रही पाठविले होते. परंतु त्याची दखल न घेता त्या बस सेवेत दाखल केल्याने आजची परिस्थिती उदभवली आहे.

Web Title: The fire administration is responsible for the buses