सायबरच्या १,५०० तक्रारी
By Admin | Updated: September 12, 2016 03:10 IST2016-09-12T03:10:06+5:302016-09-12T03:10:06+5:30
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीकरिता करण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात २०१६ च्या पहिल्या केवळ सात

सायबरच्या १,५०० तक्रारी
पंकज रोडेकर , ठाणे
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीकरिता करण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात २०१६ च्या पहिल्या केवळ सात महिन्यांत सुमारे दीड हजार तक्रारी सायबर सेलकडे नोंदल्या आहेत. सोशल मीडियावर अश्लील चित्रफीत टाकणे, फेसबुकवरून धमक्या देणे या व अशा प्रकरणांत जवळचा नातेवाईक किंवा व्यक्ती गुंतल्याचे चौकशीत उघड झाल्यावर तक्रारदार पाठ फिरवतात, अशी खंत पोलिसांनी व्यक्त केली. मात्र असंख्य अडीअडचणींनंतरही मागील साडेतीन वर्षात ठाणे पोलिसांनी १७७ गुन्हे दाखल करून ३५ जणांच्या मुसक्या आवळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहर पोलीस आयुक्तालयात २०११ यावर्षी ३८१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. २०१२ मध्ये ही संख्या दुप्पट होऊन ६१९ झाली तर २०१३ मध्ये १,०७१ झाली. २०१४ साली सुमारे १५०० तक्रारी प्राप्त झाल्या तर २०१५ मध्ये त्यामध्ये झापाट्याने वाढ होऊन २७४७ वर गेले. या वर्षात २०१६ मधील सात महिन्यात सुमारे १,५०० तक्रारी सायबर गुन्ह्यांसंदर्भात प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक गुन्हे क्रेडीट-डेबीट कार्ड फ्रॉडचे असून त्यापाठोपाठ फेसबुक ,वेबसाईट, ई-मेल, धमकीचे मेल, अश्लिल एसएमएस, इंटरनेट बँकींग, लॉटरी , मोबाईल,आॅनलाईन नोकरी, कर्ज, इतर अशा तक्रारींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एखाद्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबीट-क्रेडीट कार्डाची माहिती घेण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अशी माहिती देऊ नये. त्याबाबत बँकेत जाऊन खातरजमा करावी. तसेच फेसबुक यासारख्या सोशल मीडियाद्वारे तरूणाई नवीन मित्र शोधण्यास मग्न असते.यातून फसवणूकीच्या घटना वाढीस लागलेल्या दिसतात. इंटरनेट चॅटच्या माध्यमातून अनेक मित्रांशी ओळख झाली तरी त्यांना प्रत्यक्षात भेटणे टाळा तसेच आपल्या शाळेसह मोबाईल नंबर, फोटो, पत्ता इत्यादी माहिती टाकू नका. इंटरनेटचा वापर मर्यादीत ठेवा,अनावश्यक लिंकवर क्लिक करु नका. अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये इंटरनेट असल्याने मोबाईल चोरीस गेल्यास त्याची तत्काळ तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.