आयुक्त म्हणतात, सारा खेळ कल्पनेचा...
By Admin | Updated: December 24, 2016 03:09 IST2016-12-24T03:09:58+5:302016-12-24T03:09:58+5:30
भविष्यात कळव्याची खाडी राहील की नाही, ही भीती माझ्या मनात होती. तीच मी महासभेत व्यक्त केली. परंतु, ते माझ्या मनातील

आयुक्त म्हणतात, सारा खेळ कल्पनेचा...
ठाणे : भविष्यात कळव्याची खाडी राहील की नाही, ही भीती माझ्या मनात होती. तीच मी महासभेत व्यक्त केली. परंतु, ते माझ्या मनातील काल्पनिक विचार होते. त्यामुळे एवढ्या गोष्टी घडतील, हे मला माहीत नव्हते, असे उद्गार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत काढले. आयुक्तांनी व्यक्त केलेले विचार जरी काल्पनिक असले, तरी त्या अनुषंगाने महासभेने केलेला ठराव काल्पनिक नाही, असा चिमटा महापौर संजय मोरे यांनी काढला.
पारसिक चौपाटी विकसित करण्याच्या ठामपाच्या योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी कळवा खाडीकिनाराही सुशोभित करण्याचा आपला मानस होता का, असा सवाल केला असता आयुक्तांनी वरील उद्गार काढले. ते म्हणाले की, येथील पाइपलाइनलगत असलेल्या सुमारे २४० अतिक्रमणांवर कारवाई करणार, असे आम्ही सांगितले होते. त्यानुसार, त्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे या रहिवाशांचा सर्व्हे करून नगरसेवक आणि आमदारांशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरात केले जाणार होते. ही जागा पालिकेची असल्याने पालिका त्यांचे पुनर्वसन करणार होती. परंतु जानकीनगर, महात्मा फुलेनगर आदींसह कळवा खाडीकिनारी असलेली बांधकामे ही महसूल विभागाच्या जमिनीवर असल्याने त्यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई होणार आहे. पारसिक रेतीबंदरची जागा ज्या पद्धतीने महसूल विभागाच्या मदतीने पालिकेने अतिक्रमणमुक्त केली होती. त्यानुसारच, महसूल विभागाला पालिका मदत करणार होती. त्याकरिता, कायदेशीर प्रक्रिया महसूललाच पूर्ण करायची आहे.
आयुक्तांनी महासभेत व्यक्त केलेल्या विचारांमुळे विधान परिषदेच्या सभापतींचे स्थगिती आदेश असतानाही महासभेने कारवाई सुरू ठेवण्याबाबत आदेशांच्या विपरित ठराव केला. (प्रतिनिधी)