‘स्वच्छ भारत’ची केडीएमसीकडून खिल्ली

By Admin | Updated: December 22, 2016 05:41 IST2016-12-22T05:41:34+5:302016-12-22T05:41:34+5:30

केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची केडीएमसी प्रशासनाने खिल्ली

Cleansing of Clean India by KDMC | ‘स्वच्छ भारत’ची केडीएमसीकडून खिल्ली

‘स्वच्छ भारत’ची केडीएमसीकडून खिल्ली

कल्याण : केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची केडीएमसी प्रशासनाने खिल्ली उडवल्याचे मंगळवारच्या महासभेत उघड झाले. हगणदारीमुक्त प्रभागांची सादर केलेली यादी बोगस आहे, असा आरोप सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी केला. यावर प्रशासनाने सादर केलेला घोषणेचा प्रस्ताव फेटाळून लावत चौकशीचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार केडीएमसी हद्दीतही हगणदारीमुक्त प्रभागाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याअंतर्गत राबवलेल्या अभियानात महापालिकेच्या १२२ प्रभागांपैकी ८६ प्रभाग हे हागणदारीमुक्त प्रभाग झाल्याची घोषणा करणारा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत मान्यतेसाठी दाखल केला होता. तो चर्चेला येताच रोहिदास वाडा प्रभागाच्या नगरसेविका शकीला खान यांनी यादीतील त्यांच्या नावाला हरकत घेतली. आजही माझा प्रभाग हागणदारीमुक्त न झाल्याची माहिती सभागृहात दिली. प्रशासनाने खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक विश्वनाथ राणे यांनीही यादी बोगस असल्याची टीका केली. प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचे पत्र नगरसेवकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहे, असा गंभीर आरोप नगरसेविका रेखा चौधरी यांनी केला. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या ‘स्वच्छ भारत’ची प्रशासनाने चेष्टा केली आहे. याप्रकरणी मनसेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार करणार आहे, असे नगरसेवक पवन भोसले यांनी स्पष्ट केले. महापौरांनीही याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भोसले यांनी केली. नगरसेवक राहुल दामले यांनी तर मी पत्रावर सही दिली असताना प्रशासनाने सादर केलेल्या हगणदारीमुक्त यादीत माझ्या प्रभागाचे नाव नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले असता सभागृहात एकच हंशा पिकला.
दरम्यान, महापौर देवळेकर यांनीही यावेळी प्रशासनाच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यांना कोणतेही गांभिर्य गांभीर्य नाही. केवळ कागदोपत्री कामे दाखविली जात आहेत. अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही. अनेक ठिकाणी शौचालये दुरुस्त देखील झालेली नाहीत. नगरसेवकांच्या भावना तीव्र असून, यात जातीने लक्ष घालावे, अशा शब्दांत महापौरांनी आयुक्त रवींद्रन यांना सुनावले. (प्रतिनिधी)

Web Title: Cleansing of Clean India by KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.