अंबरनाथच्या नागरिकांना ऐन थंडीत पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:08 AM2020-12-13T00:08:01+5:302020-12-13T00:08:17+5:30

प्राधिकरण अपयशी; चिखलोलीतून सहा दशलक्ष लीटर पुरवठा बंद

Citizens of Ambernath are suffering from water scarcity | अंबरनाथच्या नागरिकांना ऐन थंडीत पाणीटंचाईचे चटके

अंबरनाथच्या नागरिकांना ऐन थंडीत पाणीटंचाईचे चटके

Next

अंबरनाथ : जीवन प्राधिकरणाने येथील चिखलोली धरणातून पाणी उचलणे बंद केल्याने त्याचा थेट फटका हा अंबरनाथ शहराला बसत आहे. थेट सहा दशलक्ष लीटर पाणी कमी झाल्याने प्राधिकरणाने एमआयडीसीचे पाणी थेट अंबरनाथ पूर्व भागाला वळविले आहे. त्यामुळे पश्चिम भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे चिखलोलीतून जो पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्या प्रमाणात एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळत नसल्याने पूर्व भागालाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात प्राधिकरण अपयशी ठरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.

अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणी दूषित असल्याचे कारण पुढे करत प्राधिकरणाने धरणातून होणारा सहा दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा बंद केला. या धरणातून नवरेनगर आणि महालक्ष्मीनगर परिसरापर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्यावर या धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसीकडून अतिरीक्त सहा दशलक्ष लीटर पाणी घेणे गरजेचे होते. मात्र, एमआयडीसी हे वाढीव पाणी देण्यास तयार नसल्याने आता उपलब्ध पाण्यावरच सर्व शहराची तहान भागविण्याचे काम प्राधिकरणाला करावे लागत आहे. मात्र, ते करत असताना शहराच्या दोन्ही भागांना मुबलक पाणी देण्यात प्राधिकरण सक्षम नाही. पश्चिम भागाला जो पुरवठा केला जात आहे, त्यातील दोन ते तीन दशलक्ष लीटर पाणी थेट पूर्व भागाला वळविण्यात आले आहे. राजकीय दबावामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

चिखलोली धरणाच्या पाणीसाठ्याची तूट भरून काढण्यात प्राधिकरण सक्षमपणे काम करत नाही, तर दुसरीकडे एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी राजकीय प्रभाव पाडण्यात सर्वच राजकीय पक्षांना अपयश आले आहे. वाढीव पाणी मिळत नसल्याने आता जावसई, फुलेनगर, कमलाकरनगर, कोहोजगांव, नालंदानगर, नारायणनगर या भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्राधिकरणाकडे मुबलक पाणी नसल्याने प्राधिकरणाचे अधिकारीही हातवर करत आहेत. त्यामुळे या पाण्याच्या समस्येबाबत कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्न पडला आहे.

पाण्याचे नियोजन करण्यात प्राधिकरणाला अपयश आले आहे. राजकीय दबावापोटी अधिकारी पाणी वळविण्याचे काम करीत आहेत. एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, तेच काम केले जात नाही.    - उमेश पाटील, नगरसेवक
पाण्याची समस्या ही आजची नाही. जीवन प्राधिकरणाने पाण्याचे योग्य नियोजन केलेले नाही. पाणीपुरवठा वळविण्यात आल्याने पश्चिम भागाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे.     - चरण रसाळ, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Citizens of Ambernath are suffering from water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.