पालघर-त्र्यंबकेश्वर महामार्गाला केंद्राकडून निधी
By Admin | Updated: December 22, 2016 05:26 IST2016-12-22T05:26:24+5:302016-12-22T05:26:24+5:30
पालघर, मनोर, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या चौपदीकरणासाठी

पालघर-त्र्यंबकेश्वर महामार्गाला केंद्राकडून निधी
हितेन नाईक / पालघर
पालघर, मनोर, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या चौपदीकरणासाठी केंद्राकडून भरीव निधी मिळणार आहे. मनोर मार्गे जाणाऱ्या या महामार्गा दरम्यान मनोर गावात नेहमीच दिसून येणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बायपास रस्त्यांच्या उभारणीसाठी ३ ते े४ प्रस्ताव शासनाला सादर केल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
रायगड ते सिंधुदुर्ग हा सागरी महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून पालघर जिल्ह्याचा त्यात समावेश नसल्याने पालघर मधील सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळेल या दृष्टीने पालघर जिल्ह्याचाही समावेश करावा अशी विनंती शासनाला करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पालघर मधला सागरी महामार्ग पालघर, माहीम, सफाळे, ते वरईमार्गे राष्ट्रीय महामार्गाला मिळतो अशा वेळी वसई या मार्गापासून अलिप्त रहात असल्याने वैतरणा खाडीवर (वाढीव बेटा) पुलाची उभारणी करून वसई शहराला या सागरी महामार्गाने डायरेक्ट जोडले जाणार असून तसा प्रस्ताव प्रधान सचिवांपुढे ठेवण्यात आला. त्यांनीही या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविल्याची माहिती बांगर यांनी दिली.
जिल्हा मुख्यालयाच्या ४४० एकर क्षेत्राचा मास्टर प्लॅन मंजूर असून मुख्यालयाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांच्या बळकटीकरणाची महत्वपूर्ण गरज त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या अनौपचारिक संवादादरम्यान व्यक्त केली. पालघर शहराला पूर्व-पश्चिम असे जोडण्यासाठी सध्या एकच पूल असून अन्य दोन पुलाचा प्रस्ताव आहे. (त्यातील एकला मंजुरी मिळाली आहे.) मुख्यालयाला जोडणाऱ्या रस्त्यांची कनेक्टिव्हटी पाहून पूल उभारण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. मोरेकुरंन - दापोली या सागरी महामार्गा वरील पूल मागील १० वर्षांपासून उभारल्या नंतर बेवारस पडून होते. त्याच्या रस्त्यांचे बळकटीकरण करण्याचे कामही हाती घेण्यात आले असून तो परनाळी पर्यंत जोडला जाणार आहे. त्यामुळे पालघर ते बोईसर हा अत्यंत क्लिष्ट अशा मार्गावरील प्रवास आता टाळला जाणार आहे. डहाणू कडे जाणाऱ्या प्रवाशांना दापोली-परनाळी मार्गाने (बोईसरच्या बाहेरून) थेट डहाणूकडे जाता येणार आहे.
तसेच पालघर-बोईसर, बोईसर-चिल्हार रस्त्याच्या चौपदीकरणाला मंजूरी मिळाली असून बोईसर-चिल्हार रस्ता एमआयडीसी कडून बांधून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. संबंधित सचिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती बांगर यांनी दिली. या वेळी पालघर मुख्यालयाचे मार्ग सहापदरी राहणार आहेत. तारापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सभोवतालच्या ५ ते १६ किलोमीटर क्षेत्रातील गावांना जोडण्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचिवण्याच्या दृष्टीने नव्या रस्त्यांचा व काही ठिकाणी पूल उभारणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची कामे टप्याटप्याने हाती घेतली जाणार आहेत.
जिल्ह्यात अवैध रेतीउत्खननाला बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु असल्याने हि रेती चोरी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखल्या जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ५ नोव्हेंबर रोजी वैतरणा सह अन्य रेतीबंदरावर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शंभर टक्के रेती उत्खनन रोखल्याचे निदर्शनास आले आहे.
वैतरणा रेतीबंदरावर हत्यारबंद पोलिसबंदोबस्त असलेल्या पोलिसचौकीची व्यवस्था करण्यात आली असून अवैध रेतीउत्खनन होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे बांगर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)