व्यंगचित्रांद्वारे दिला जातोय पाणी वाचवण्याचा संदेश
By Admin | Updated: May 15, 2016 03:50 IST2016-05-15T03:50:21+5:302016-05-15T03:50:21+5:30
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘कार्टुनिस्ट कम्बाइन संस्थे’ने व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. संस्थेने येथील आनंद बालभवनमध्ये दोन दिवसांचे व्यंगचित्र प्रदर्शन भरवले आहे

व्यंगचित्रांद्वारे दिला जातोय पाणी वाचवण्याचा संदेश
डोंबिवली : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘कार्टुनिस्ट कम्बाइन संस्थे’ने व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. संस्थेने येथील आनंद बालभवनमध्ये दोन दिवसांचे व्यंगचित्र प्रदर्शन भरवले आहे. त्याचा प्रारंभ शनिवारी झाला. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल.
गणेश जोशी यांच्या पुढाकाराने भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातील आणि इंदूर, दिल्ली येथील ५० व्यंगचित्रकारांची १०० व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. १९७२ मध्ये महाराष्ट्रात असाच भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुख व व्यगंचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी दुष्काळाची दाहकता दाखवणारे व्यंगचित्र रेखाटले होते. ते व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहता येईल. प्रदर्शनाच्या सुरुवातीस हे व्यंगचित्र मांडले आहे. त्याचबरोबर मंगेश तेंडुलकर, गणेश जोशी, प्रभाकर वाईरकर, व्ही.ए. हसबनीस, सुरेश सावंत, निलेश जाधव, श्रीनिवास प्रभुदेसाई, सुधाकर सोनी आदी प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. याशिवाय, लहानगे व्यंगचित्रकार प्रथमेश काटकर आणि श्वेता शेवाळे यांचीही व्यंगचित्रे आहेत. (प्रतिनिधी)राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत पाणी कसे वाचवता येईल, त्याचा गैरवापर कसा टाळता येईल, कूपनलिकांचा अतिवापर, चुकीची पीकपद्धती, रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि सरकारी यंत्रणेतील त्रुटी अशा अनेक विषयांवर हलकेफुलके विनोदी मार्मिक भाष्य करणारी व्यंगचित्रे प्रदर्शनातून पाहता येतील.विविध विषयांवर दृष्टिक्षेप
निसर्गावर केली मात - यापुढे पाणीकपात, अपव्यय टाळा - पाणी वाचवा... असे संदेश या प्रदर्शनाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तंत्रज्ञान पुढे गेले असले तरी निसर्गनिर्मित पाणी संगणकावर डाऊनलोड करता येत नाही. यावरही, त्यात भाष्य करण्यात आले आहे. पैशांच्या बँका सुरू झाल्या, पण पाणीबँक ही संकल्पना आपल्याकडे रुजवली जात नाही. महिलांना मंदिर प्रवेशापेक्षा त्यांना पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. यावर, प्रदर्शनातील व्यंगचित्रे कटाक्ष टाकणारी आणि लक्षवेधी आहेत.