‘पदवीधर’ पराभवाचा भाजपा काढणार वचपा
By Admin | Updated: May 24, 2016 02:20 IST2016-05-24T02:20:01+5:302016-05-24T02:20:01+5:30
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार संजय केळकर यांच्या केलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी ठाणे-पालघर स्था. स्व. संस्था मतदारसंघातील
‘पदवीधर’ पराभवाचा भाजपा काढणार वचपा
डोंबिवली : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार संजय केळकर यांच्या केलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी ठाणे-पालघर स्था. स्व. संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीमुळे चालून आल्याचे भाजपाच्या एका नेत्याने ‘लोकमत’कडे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्याकरिता नाही, तर डावखरेंना विरोध म्हणून भाजपा या निवडणुकीत मित्रपक्षाला साथ देणार असल्याचे या नेत्याने सांगितले.
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आता भाजपात नगरसेवक म्हणून ठिकठिकाणी निवडून आले आहेत, त्यांची मतेही शिवसेनेच्या उमेदवाराला पडतील, हे पाहणे ही भाजपाची खरी कसोटी आहे. मात्र, पक्षादेश व पक्ष धोरणांमुळे आमचे डावखरे यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध असूनही आम्ही युतीच्याच उमेदवारासोबत राहणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बदलापूरसह अंबरनाथ, कल्याण आणि डोंबिवली येथील पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी डावखरेंना भेटले होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील १२२ सदस्यांपैकी युतीचे १०६ सदस्य आहेत. त्यापैकी सर्व शंभरहून अधिक मते युतीच्या उमेदवाराला मिळावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. काही मते फुटण्याची शक्यता असल्याने कोण फुटू शकते, याची चाचपणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
विधान परिषद निवडणुकीत मनसे मतदान करणार असून कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर आणि अंबरनाथ या ठिकाणी पक्षाची १४ मते आहेत. त्यापैकी केडीएमसीत ११ मते आहेत. ही मते नेमकी कोणाच्या पारड्यात टाकायची, त्याचे आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप दिलेले नाही.
- राजू पाटील,
सरचिटणीस, मनसे