- नितिन पंडीत
भिवंडी - शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथील तीन माजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना २१ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत . या दुर्दैवी घटनेत अनेक परिवार उध्वस्त झाले आहेत. तर अनेक जण आपल्या परिवारातील सदस्यांच्या आठवणीत दिवस काढत आहेत. या दुर्दैवी घटनेत कुणाची आई कुणाचे बाबा , कुणाचा भाऊ कुणाची बहीण कुणाचा मुलगा कुणाची लेक तर कुणाचं भविष्य अक्षरशः उद्ध्वस्थ झाले आहे. आजही हि घटना आठवली तर या घटनेत आपला जीव वाचलेल्या मात्र परिवार गमावलेल्या माणसांचे अश्रु आजही अनावरच होत आहेत.
शब्बीर कुरेशी हा या दुघटनेत वाचलेला मात्र परिवार उध्वस्त झालेला एक इसम आहे. या दुर्घटनेत शब्बीर कुरेशी यांनी आपल्या पत्नीसह दोन लहानगी मुले गमावली आहेत. शब्बीर कुरेशी यांची २८ वर्षीय पत्नी परवीन कुरेशी यांच्या सह चार वर्षांची मुलगी मरियम व अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ असे तीन जण या दुर्घटनेत मृत्यू पावले आहेत तर त्यांची दोन मुले आठ वर्षांचा सादिक व सहा वर्षांचा शाहिद हि दोन मुले या दुर्घटनेत वाचली आहेत. मात्र त्यांचा अडीच वर्षांचा मुसेफ हा या दुर्घटने नंतर आजही बेपत्ता आहे. बेपत्ता मुसेफच्या शोधासाठी शब्बीर रोज दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ येऊन आपल्या चिमुरड्याचा शोध घेत आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्याची येथील शोधमोहीम चार दिवसांनंतर थांबली आहे. मात्र तब्बल १३ दिवस शब्बीर एकटेच या ढिगाऱ्याच्या आजूबाजूला घुटमळतांना दिसत आहेत. शब्बीर रोज इथे येतो ढिगाऱ्यातील दगड विटा व इतर मलबा बाजूला करतो व त्याखाली आपल्या अडीच वर्षांच्या मुसेफचा शोध घेतो. मात्र तो मिळत नसल्याने हताश व निराश होऊन पुन्हा थकल्या पावलांनी घरी परततो . शाब्बीरचा हा दिनक्रम तब्बल १३ दिवसांपासून अविरत सुरूच आहे.
दरम्यान मी रोज येथे येतो मुलाचा शोध घेतो मात्र तो मिळत नसल्याने पुन्हा माघारी घरी जातो मुलाची आणि परिवाराची आठवण मला अस्वस्थ करते माझा मुलगा मला मिळाला नाही त्यामुळे मी माझ्या चिमुरड्याची कायम वाट पाहत राहीन अशी भावनिक प्रतिक्रिया शब्बीर कुरेशी यांनी दिली आहे .