भार्इंदर पालिकेने दमदाटीने तोडली जुनी बांधकामे
By Admin | Updated: June 21, 2016 01:19 IST2016-06-21T01:19:01+5:302016-06-21T01:19:01+5:30
भार्इंदर पुर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मीरा भार्इंदर महापालिकेने मोबदला न देताच जुनी बांधकामे दमदाटी आणि दडपशाहीने तोडल्याचे समोर आले आहे.

भार्इंदर पालिकेने दमदाटीने तोडली जुनी बांधकामे
मीरा रोड : भार्इंदर पुर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मीरा भार्इंदर महापालिकेने मोबदला न देताच जुनी बांधकामे दमदाटी आणि दडपशाहीने तोडल्याचे समोर आले आहे. यांमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून पालिकेच्या झुंडशाही विरुध्द संताप व्यक्त करताना लोकांना अश्रू अनावर झाले. दुसरीकडे, भाजपा आमदाराची सदनिका आणि दुकान असणाऱ्या अनधिकृत शीतल निकेतनसह श्याम भवन इमारतीला मात्र हातही लावला नसल्याने प्रशासन भाजपा आमदाराच्या सोयीनुसार बांधकामे तोडत असल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे. दरम्यान, ही तोड कारवाई सलग रेषेत नसल्याने रुंदीकरण कोणाच्या सोयीसाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भार्इंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर ग्रामपंचायतीपासून निवासी इमारती, दुकाने तसेच औद्योगिक गाळे आहेत. पालिकेने ही बांधकामे चक्क अनधिकृत ठरवत बाऊन्सर आणि पोलीस बंदोबस्तात दमदाटी व दडपशाही करुन तोडण्याचा सपाटा लावला आहे. येथे फेरफटका मारला असता पालिकेने केलेल्या अत्याचाराचे पाढे मांडता मांडता लोकांना हुंदके आवरेनासे झाले.
१९६५ पासूनची दळवी इस्टेट मधील दुकाने कोणतीही नोटीस न देताच तोडण्यात आली. लोकांना जराही वेळ दिला नाही असे येथील नुकसानग्रस्त लोकांनी सांगितले. येथील जी.एम.पाटील इस्टेट तळ अधिक १ मजली दर्शनी भागात १२ दुकाने होती. २००२ मध्ये रुंदीकरण केले तेव्हा दुकानांचा दर्शनी भाग तोडला होता. त्याचा मोबदला अद्यापही लोकांना मिळाला नाही.
घीसुलाल रोटागण यांचे इलेक्ट्रीकल वस्तुंचे दुकान ३५ वर्षांपासुन होते. १३१ फुटाचे दुकान आता ४० फुट राहिल्याचे ते म्हणाले. प्रकाश लोढा यांचे पदम आॅर्नामेंट हे दुकान देखील १५० फुटा ऐवजी आता जेमतेम ७० फुट उरले आहे. १९७० पासुन असलेले चप्पलचे दुकान तर पुर्णच गेले असुन मोबदला नाही व रोजगार पण नसल्याने उपासमारीची पाळी आल्याचे देवाडिगा यांनी सांगितले.मातृछाया या तळ अधिक १ मजली इमारतीला धोकादायक ठरवुन पाडण्यात आले.
साई जागृतीच्या बाजूला सेनेचे विभागप्रमुख दत्ता माळी यांचे दत्त निवास हे एकमजली बांधकाम आहे. २००२ मध्ये काही भाग तोडला. आता देखील पालिका अधिकारी सरळ जेसीबी घेऊन आले व तुम्ही तोडा नाही तर आम्ही जेसीबी लावतो असा दमच दिला. सामानाचे नुकसान होऊ नये म्हणुन दुकानाचा आणखी काही भाग तोडला असे माळी म्हणाले. (प्रतिनिधी)
१०० टक्के बाधितांचे पुनर्वसन महिनाभरात
भार्इंदर : पालिकेच्या शहर विकास आरखड्यानुसार पालिकेने सुरु केलेल्या तोड कारवाईवरुन तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी वास्तविक जी बांधकामे रस्ता रुंदीकरणात १०० टक्के बाधित झाली आहेत, त्यांना येत्या ३० दिवसांत पर्यायी जागा देऊन त्यातील लोकांचे पुनर्वसन पालिकेमार्फत केले जाईल, अशी माहिती आ. नरेंद्र मेहता यांनी दिली आहे.
शहर विकास आराखड्याला मंजुरी मिळुन १९ वर्षे पुर्ण झाल्यानंतरही प्रशासनाने त्यातील अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम व अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण गुलदस्त्यात ठेवले होते. अखेर त्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्याची जाग प्रशासनाला आली. यामुळे जनतेत प्रक्षोभ उसळल्याने बाधितांच्या पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यातील १०० टक्के बाधितांसह ५० टक्के बाधितांचे त्यांच्या नुकसान भरपाईपोटी अतिरीक्त चटईक्षेत्र अथवा टिडीआर देऊन पुनर्वसन करण्यात येणार आहे. या कारवाईत संपुर्ण शहरातील सुमारे १२ इमारती पुर्णपणे बाधित होत असल्याने त्यांच्या पुनर्विकासाकरीता पालिकेकडून परवानगी तसेच त्यातील रहिवाशांना आणि जागा मालकांना विश्वासात घेऊन त्यांना पुनर्विकासाची संधी दिली जाणार आहे. शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथील रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक आहे. शहरात सुमारे ५ हजारांहुन अधिक वाहने ये-जा करीत असतात. त्यांच्या वाहतुकीसाठी शहरात केवळ दोनच मुख्य रस्ते अस्तित्वात असुन इतर अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे त्यांचे रुंदीकरण गरजेचे आहे.