लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: June 23, 2016 03:05 IST2016-06-23T03:05:45+5:302016-06-23T03:05:45+5:30
केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने बदलापूरमध्ये बांधण्यात आलेल्या बीएसयूपी योजनेतंर्गत ८०० घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत
बदलापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने बदलापूरमध्ये बांधण्यात आलेल्या बीएसयूपी योजनेतंर्गत ८०० घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यातील अनेक घरांसाठी योजनेच्या लाभार्थांनी पालिकेकडे पैसे देखील भरले आहेत. मात्र तीन वर्ष झाले तरी या लाभार्थांना अद्याप घरे मिळालेली नाही. त्यामुळे या बीएसयूपी योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
राज्यातील सर्वात कमी झोपडपट्टी असलेल्या शहरांपैकी एक शहर म्हणजे बदलापूर. बदलापूरमध्ये सर्वाधिक कमी झोपडपट्टी असल्याने हे शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी २०१० मध्ये केंद्र, राज्य सरकार आणि पालिका यांच्या मदतीने बीएसयूपी योजना राबविण्यात आली. या योजनेचे २०१२ मध्ये पहिल्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले. तयार झालेली घरे मिळावी यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी ३५ ते ४५ हजारापर्यंत रक्कम पालिकेकडे भरली होती. आपल्या हक्काचे घर मिळेल या आशेवर त्यांनी कर्ज घेऊन ही रक्कम पालिकेकडे भरली. मात्र ही रक्कम भरुन तीन वर्ष झाले तरी या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर अद्याप मिळालेले नाही. बदलापूर एकमेव शहर आहे की जेथे बीएसयूपी योजनेचे काम पूर्ण होत असतानाही लाभार्थी मात्र घरांपासून वंचित राहिले आहे. लाभार्थी पालिकेत नियमीत पाठपुरावा करत असून त्यांच्या वाट्याला केवळ आश्वासनेच येत आहेत.
बदलापूरमधील म्हाडा कॉलनी परिसरातील तयार घरांचे वाटप करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी घरांची सोडतही काढली होती. त्यानुसार त्या लाभार्थ्यांना घराचे वाटप करण्यात आले. मात्र घर मिळाले असले तरी त्याचा ताबा मिळाल्याचे पत्र अद्याप पालिकेने दिलेले नाही. तर सोनिवली येथे इमारती तयार असतानाही लाभार्थीना घरांचे वाटप केलेले नाही. (प्रतिनिधी)