बाप्पांचे विसर्जन, आता ‘फेसबुक’दर्शन!
By Admin | Updated: September 7, 2016 02:50 IST2016-09-07T02:50:49+5:302016-09-07T02:50:49+5:30
‘गणपती बाप्पा मोरया..., पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात मंगळवारी दीड दिवसाच्या बाप्पाला ठाणेकरांनी भावपूर्ण निरोप दिला.

बाप्पांचे विसर्जन, आता ‘फेसबुक’दर्शन!
ठाणे : ‘गणपती बाप्पा मोरया..., पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात मंगळवारी दीड दिवसाच्या बाप्पाला ठाणेकरांनी भावपूर्ण निरोप दिला. ठाणे आयुक्तालयाअंतर्गत ४० हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. या निरोपाचे क्षण अन् क्षण मोबाइल कॅमेऱ्यामध्ये टिपून घेत ते फेसबूक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशलसाइटवर टाकून आपण अपडेट असल्याचेही गणेशभक्तांनी दाखवून दिले. वर्षभर आपल्या लाडक्या गणरायाची आतूरतेने वाट पाहणाऱ्या गणेशाचे सोमवारी वाजत गाजत, मंगलमय वातावरणात आगमन झाले आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरात दीड दिवस विराजमान झालेल्या बाप्पाला ठाणेकरांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.
घराघरांत दुपारपासून बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू होती. कोणी हातगाडीवर, कोणी चालत, कोणी ट्रकमधून बाप्पाला विसर्जनासाठी नेत होते. हातात टाळ घेऊन लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सर्वच भाविक या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांची विसर्जन स्थळांवर गर्दी झाली होती. विसर्जनादरम्यानचे दृश्य भाविक आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्तही करताना नजरेस पडत होते.
मंगळवारी ठाणे आयुक्तलयातील ४० हजार २८८ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यात परिमंडळ १ अंतर्गत ४६००, परिमंडळ २ अंतर्गत २९९०, परिमंडळ ३ अंतर्गत १२ हजार ८२५, परिमंडळ ४ अंतर्गत ११०५७, परिमंडळ ५ अंतर्गत ८८१६ इतक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. ठाणे मनपा हद्दीत १३,४१६ खाजगी मूर्तींचे विसर्जन झाले. हिंदू संस्कृतीप्रमाणे श्री गणेश मूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यातून ठामपाने पारिसक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले. त्यामुळे येथेही बाप्पाचे विसर्जन झाले. वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव, उपवन तलाव, निळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी, बाळकुम रेवाळे व खारेगांव या ठिकाणी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांत विसर्जन झाले. मडवी हाऊस, वर्तकनगरमध्ये व्यंकटेश मंदिर, चिरंजीवी हॉस्पीटल, पोखरण रोड नं. २ येथे वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट रोड नं.१६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, पाईप लाईन ब्रीज, १६ नं. पाईपलाईन ब्रीज, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका येथील केंद्रांनाही भाविकांनी प्रतिसाद दिला.
मुरबाडमध्ये ढोल ताशाच्या गजरात दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन
मुरबाड : सोमवारी मोठ्या थाटात विराजमान झालेल्या गणरायाला दीड दिवसात ढोलताशाच्या गजरात आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील मुरबाड नदी, शिवळे, टोकावडे, धसई, व बारवी नदीच्या पात्रात तसेच तलावामध्ये विसर्जनासाठी निघालेल्या गणरायाला निरोप देताना कुटुंबीयांना वाईट वाटत होते. आंनदात व उत्साहात न्हाऊन गेलेल्या गणेशभक्तांना गणरायाचे विसर्जन झाल्याने गजबजलेले घर रिकामे वाटत होते.
शहापुरात बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप
शहापूर : दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचे मंगळवारी भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. शहापूर येथील भारंगी नदीवरील गणेशघाट, वाफे येथील श्री गंगा देवस्थानजवळील गंगा नदी, सापगाव येथील भातसा नदी येथे विसर्जन झाले. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड दिवसांच्या १२०० गणपतींना निरोप देण्यात आला.
शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या स्थानिक निधीतून गंगाघाट बांधल्याने या वेळी विसर्जनच्या वेळी स्वच्छता होती; परंतु भारंगी नदीत पाण्याची खोली कमी असल्याने मूर्ती वाहून न जाता जागीच राहत आसल्याचे दिसत होते. पोलीस बंदोबस्तामुळे अनुचित प्रकार न होता शांततेत विसर्जन झाले.
यंदाच्या विसर्जनाचे वैशिष्ट्य
वागळे इस्टेट येथे रायलादेवी विसर्जन घाटावर बाप्पाचे विसर्जन चक्क एका महिलेने केले. ती स्वत:च्या हातात बाप्पाची मूर्ती घेऊन आली होती. एका बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही घोडागाडीतून निघाली होती, हे दोन आगळे वेगळे दृश्य ठाणेकरांच्या नजरेस पडले.
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मंगळवारी दीड दिवसांच्या सुमारे पाच हजार ७७१ गणेश मूर्तींचे भक्तीभावाने विसर्जन झाले. शहरात दीड दिवसांच्या सार्वजनिक २७ तर घरगुती पाच हजार ७७१ मूर्तींची स्थापना करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. यावेळी पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात, नाचत व वाजत गाजत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. महापालिकेने शहरातील २२ तलाव, खाडी व समुद्र किनारी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. त्यात विद्युत, निर्माल्य कलश, आरतीसाठी व्यवस्था यांचा समावेश आहे, असे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये, यासाठी ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, वाहतूक पोलीस, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रक पथक, राज्य राखीव दलाची तुकडी व ५० होमगार्ड असा मोठा बंदोबस्त तैनात होता.
कल्याण : ‘मंगलमूर्ती मोरया,’ ‘पुढल्या वर्षी लवकर,’ या अशा गजरात गणेशभक्तांनी मंगळवारी दीड दिवसाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप दिला. कल्याण-डोंबिवली परिसरातील १२ हजार ८२५ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शहरातील विविध ठिकाणच्या गणेश विसर्जन स्थळी झाले.
जुनी डोंबिवली, रेतीबंदर गणेश घाट, कल्याणमधील दुर्गाडी गणेश घाट अशा मोठ्या विसर्जन स्थळांसह खंबाळपाडा, संदप गाव, चोळेगाव, एमआयडीसी, कचोरे, खोणी, आधारवाडी, गौरीपाडा, गोविंदवाडी, रेतीबंदर आदी परिसरातील तलाव, खदाणी, विहिरी येथेही गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात कल्याणमधील दोन हजार ८७५ तर डोंबिवलीतील नऊ हजार ९५० गणेश मूर्तींचा समावेश आहे.
केडीएमसीने गणेशोत्सवात पर्यावरणरक्षणाचे आवाहन भाविकांना केले आहे. त्यादृष्टीने डोंबिवलीतील पंचायत विहीर, नेहरू मैदान, शिवम हॉस्पिटल कल्याण रोड, टिळकनगर विद्यामंदिर, अयोध्या नगरी मैदान, सम्राट चौक आनंद नगर, भागशाळा मैदान, नेरूरकर रोड, आयरे गावातील पाण्याच्या टाकीजवळ, न्यू आयरे रोड येथील स्वामी विवेकानंद शाळा, संगीतावाडी, सावरकर उद्यानाजवळ तसेच कल्याणमधील पूर्वेकडील विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, खडेगोळवली १०० फुटी रोड आणि ‘ब’ प्रभाग क्षेत्रातील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ कृत्रीम तलावांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
मोठ्या विसर्जन स्थळी पोलीस बंदोबस्त, अग्निशामक दलाचे पथक तसेच जीवरक्षक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.