आरटीई प्रवेश ३० जूनपर्यंत निश्चित करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST2021-06-18T04:28:17+5:302021-06-18T04:28:17+5:30
ठाणे : आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे, त्यांनी ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा. ...

आरटीई प्रवेश ३० जूनपर्यंत निश्चित करण्याचे आवाहन
ठाणे : आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे, त्यांनी ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत पालकांनी गर्दी करू नये. नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संतोष भोसले यांनी केले आहे. वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे १ ली ते ८ वीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे, यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीईअंतर्गत मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपांतील २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल रोजी लॉटरीची प्रक्रिया राज्य स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण ९०८८ अर्जांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर ‘प्रवेशाची तारीख’ या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याची तारीख पाहावी. प्रवेश घेण्यासाठी पाल्यांना सोबत नेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले.